16 धावांनी विजय, सामनावीर शनाकाची अष्टपैलू चमक, मेंडिसचे अर्धशतक, सूर्यकुमार, अक्षर पटेलची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था /पुणे
कुसल मेंडिसचे अर्धशतक आणि कर्णधार व सामनावीर दसुन शनाकाने अखेरच्या टप्प्यात केलेली जोरदार फटकेबाजी यांच्या बळावर लंकेने भारताविरुद्धच्या दुसऱया टी-20 लढतीत 16 धावांनी विजय मिळवित मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतके नोंदवत भारताच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण त्यांचे प्रयत्न शेवटी अपुरे पडले. या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना शनिवारी 7 रोजी राजकोटमध्ये खेळविला जाणार आहे.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर लंकेने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 206 धावांचा डोंगर रचला. मेंडिसने 31 चेंडूत 51 तर शनाकाने केवळ 22 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या. त्यानंतर दोनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची आघाडीची फळी दडपणाला बळी पडली. सूर्यकुमार व अक्षर पटेल यांनी धडाकेबाज अर्धशतके नोंदवत सहाव्या गडय़ासाठी 91 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटल्यानंतर भारताला आव्हानापर्यंत मजल मारणे कठीण गेले. लंकेच्या अचूक माऱयासमोर 20 षटकांत 8 बाद 190 धावांपर्यंतच भारताला मजल मारता आल्याने लंकेला 16 धावांनी विजय मिळाला.
सूर्या-अक्षरची फटकेबाजी
पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 51 धावा फटकावल्या तर अक्षर पटेलने फलंदाजीतही पुन्हा एकदा चमक दाखवताना 31 चेंडूत 3 चौकार, 6 षटकारांची आतषबाजी करीत 65 धावा झोडपल्या. पण शेवटी त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्याआधी सुरुवातीला इशान किशन (2), शुबमन गिल (5), राहुल त्रिपाठी (5), हार्दिक पंडय़ा (12) लवकर बाद झाल्यानंतर भारताची स्थिती 4 बाद 34 अशी झाली आणि दीपक हुडा 9 धावा काढून बाद झाल्यानंतर ती दहाव्या षटकात 5 बाद 57 अशी झाली. सूर्या व पटेल यांनी 91 धावांची भागीदारी करीत आशा निर्माण केल्या होत्या. सूर्या बाद झाल्यानंतर शिवम मावीने पटेलला चांगली साथ देत सातव्या गडय़ासाठी झटपट 41 धावांची भागीदारी केली. पण शेवटच्या षटकात दोघेही बाद झाले. मावीने 15 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 26 धावा फटकावल्या. लंकेच्या मधुशन्का, शनाका, रजिता यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. शनाकाने शेवटच्या षटकातच दोन बळी मिळविले. याशिवाय करुणारत्ने व हसरंगा यांनी एकेक बळी मिळविले.
लंकेची दमदार सलामी
भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण भारताच्या निष्प्रभ गोलंदाजीचा लाभ उठवत लंकेने प्रारंभापासून आक्रमण करीत 80 धावांची सलामी दिली. अक्षर पटेलचा अपवाद वगळता भारताच्या अन्य सर्व गोलंदाजांना भरपूर चोप मिळाला. वेगवान गोलंदाज उमरान मलिकने तीन बळी मिळविले असले तरी त्यालाही भरपूर मार बसला. पहिल्या सामन्यात हिरो ठरलेल्या शिवम मावीने तर तब्बल 53 धावा एकही बळी न मिळविता दिल्या. अर्शदीपने दुसऱयाच षटकात 19 धावा दिल्या. त्यातील दोन नोबॉलवर 17 धावा निघाल्या. कर्णधार हार्दिकनेही आपल्या दुसऱया षटकात 11 धावा दिल्या. पहिल्या सामन्यात चार बळी टिपणाऱया मावीवर हल्ला करीत मेंडिसने त्याच्या पहिल्याच षटकात 15 धावा दिल्या. स्पिनर्स अक्षर पटेल व चहल यांनी दोन षटके धावा रोखल्या. पण नंतर पथुम निसांकाने पटेलला चौकार व षटकार ठोकत धावफलक हलता ठेवला. आठव्या षटकात उमरान मलिकला गोलंदाजी मिळाली. पण त्याच्या पहिल्या षटकातही 13 धावा निघाल्या.
नवव्या षटकात भारताला पहिले यश मिळाले. चहलने मेंडिसला पायचीत केले. रिव्हय़ूमार्फत हा बळी मिळाला. पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मलिकने राजपक्षेला बाद करीत लंकेला दुसरा धक्का दिला. दहा षटकाअखेर लंकेने 2 बाद 89 धावांची मजल मारली होती. अक्षरने नंतर निसांकाला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करीत पहिला बळी मिळविला. नंतर पुढच्याच षटकात त्याने दुसरा बळी मिळविताना धनंजय डिसिल्वाला दीपक हुडाकरवी झेलबाद केले. मात्र चरित असालंकाने फटकेबाजी करीत 19 चेंडूत 37 धावा फटकावल्या. त्यात 4 षटकारांचा समावेश होता. मलिकने त्याला बाद करून त्याची खेळी संपुष्टात आणली. पुढच्याच चेंडूवर मलिकने हसरंगाचा त्रिफळा उडविला. मलिक हॅट्ट्रिकच्या मार्गावर होता. पण कर्णधार शनाकाने चौकार ठोकत त्याची हॅट्ट्रिक हुकवली. शनाकाने नंतर चौकार, षटकाराची बरसातच सुरू केली आणि संघाला दोनशेपारचा टप्पा गाठून दिला. शनाकाने 22 चेंडूत 2 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 56 धावा फटकावल्या. मेंडिसने 31 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 52, निसांकाने 35 चेंडूत 33 करुणारत्नेने नाबाद 11 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकांत 6 बाद 206 : निसांका 33 (35 चेंडूत 4 चौकार), कुसल मेंडिस 52 (31 चेंडूत 3 चौकार, 4 षटकार), राजपक्षे 2, चरित असालंका 37 (19 चेंडूत 4 षटकार), धनंजय डिसिल्वा 3, शनाका नाबाद 56 (22 चेंडूत 2 चौकार, 6 षटकार), हसरंगा 0, करुणारत्ने नाबाद 11 (10 चेंडूत 1 चौकार), अवांतर 12. गोलंदाजी : उमरान मलिक 3-48, अक्षर पटेल 2-24, चहल 1-30, मावी 0-53, अर्शदीप 0-37 (2 षटके), हार्दिक 0-13 (2 षटके).
भारत 20 षटकांत 8 बाद 190 : इशान किशन 2, गिल 5, त्रिपाठी 5, हार्दिक पंडय़ा 12, दीपक हुडा 9, सूर्यकुमार यादव 51 (36 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), शिवम मावी 26 (15 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), अक्षर पटेल 65 (31 चेंडूत 3 चौकार, 6 षटकार), उमरान मलिक नाबाद 1, अवांतर 14. गोलंदाजी : शनाका 2-4, मधुशन्का 2-45, रजिता 2-22, करुणारत्ने 1-41, हरसंगा 1-41.