गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱयाला दिसला बिबटय़ा
वार्ताहर/ किणये
गेल्या रविवारी बेळवट्टी येथील कट्टेमाळ शिवारात शिवाजी नलवडे या शेतकऱयाला बिबटय़ा दिसला होता. शिवारात बिबटय़ाचे दर्शन होऊनही वनखात्याचे अधिकारी मात्र स्वस्थ बसून आहेत. आठ दिवसांपासून वनखात्यामार्फत या भागात कोणतीच हालचाल करण्यात आली नाही. अशी परिस्थिती असतानाच बिजगर्णी येथील गावच्या वेशीजवळ बिबटय़ाची शनिवारी सकाळी एंट्री झाली. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
बिजगर्णी येथील सोमनाथ मारुती बेळगावकर हे शेतकरी गावाजवळच्या इंदिरानगर शेजारी असलेल्या शेतात गवत आणण्यासाठी गेले होते. शनिवारी सकाळी 9.30 च्या सुमारास बिबटय़ा दिसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे बिजगर्णीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आता बिबटय़ा थेट बिजगर्णी गावच्या लोकवस्तीजवळ आला असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याकडे वनखात्याचे मात्र साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत. एखाद्या व्यक्तीचा बिबटय़ाने जीव घेतल्यावरच वनखात्याला जाग येणार आहे का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
सोमनाथ बेळगावकर हे शनिवारी सकाळी जनावरांसाठी ओला चारा आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास बिबटय़ा आला. ते भयभीत होऊन गावात पळून आले. त्यांनी याबाबतची माहिती गावकऱयांना दिली. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास विमल बेळगावकर या शेताकडे जात होत्या. त्यांनाही बिबटय़ा दिसला. बिबटय़ा दिसल्यामुळे हातातील बुट्टी तेथेच टाकून त्या घाबरून घराकडे आल्या. त्यांनीही बिबटय़ाची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. यानंतर गावातील नागरिक एकत्र जमा झाले आणि सदर बिबटय़ाला हुसकावून लावण्यासाठी हातात लाठय़ा-काठय़ा घेऊन गेले. त्या शिवारात फिरून पाहिले. मात्र, तोपर्यंत बिबटय़ा तेथून निघून गेला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
शनिवारी दुपारी पुंडलिक कोळी हे आपल्या शेताकडे गेले होते. सकाळी गावातल्या एका शेतकऱयाला बिबटय़ा दिसला. यामुळे त्यांच्या मनातही भीती होतीच. त्यांच्या शेतात बिबटय़ाच्या पायाचे ठसे दिसले, असे त्यांनी सांगितले.
बिजगर्णी, बेळवट्टी, कावळेवाडी, राकसकोप येथील शेतकऱयांच्या राकसकोप धरणाच्या बाजूलाच शेती आहेत. या शिवारामध्ये बहुतांशी प्रमाणात उसाचे पीक घेण्यात आले आहे. ऊस पिकामध्ये बिबटय़ाचा वावर वाढला आहे.
रविवार दि. 14 रोजी शिवाजी नलवडे हे शेतकरी बेळवट्टी शिवारात भात पिकामध्ये युरिया खताची फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना बिबटय़ाचे दर्शन झाले. त्यादिवशी वनखात्याचे कर्मचारी आले आणि सदर परिसराची पाहणी केली. मात्र, त्यांना कोणताच सुगावा लागला नाही. यानंतर वनखात्याचे अधिकारी गावाकडे आले नाहीत. ग्राम पंचायतीमार्फत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे, असे बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष म्हाळू मजुकर यांनी सांगितले.
सोमनाथ बेळगावकर, शेतकरी बिजगर्णी
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात जनावरांसाठी ओला चारा आणण्यासाठी गेलो होतो. गवत कापत असताना झाडाच्या बाजूला काहीतरी आवाज आला. नजर वर करून पाहतो तर चक्क बिबटय़ा दिसला. सर्व साहित्य तेथेच टाकून गावात पळून आलो. आता गावाजवळच्या शेतामध्ये बिबटा आला असून या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. अन्यथा शेती करणे मुश्कील होणार आहे.
मनोहर बेळगावकर, ग्रा. पं. अध्यक्ष, बिजगर्णी
सोमनाथ व अन्य दोघा जणांना बिबटय़ा दिसला. गावकरी भयभीत झाले आहेत. वनखात्याचे अधिकारी रवि गजेप्पण्णवर यांना स्वतः फोन लावून याबाबत माहिती दिली व या भागात येऊन पाहणी करावी, असे सांगितले. मात्र, आज येणार नाही, रविवारी श्वान, सीसीटीव्ही कॅमेरा व इतर साहित्य घेऊन येतो, असे त्यांनी सांगितले. वनखात्याच्या अधिकाऱयांनी या भागाकडे दुर्लक्ष केले असल्याचे यावरून दिसून येत आहे.
अप्पू नाकाडी, शेतकरी
बेळवट्टी ग्राम पंचायत क्षेत्राच्या हद्दीत जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकऱयांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राम पंचायतीनेही वनखात्याला वारंवार कळवूनही म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. यामुळे शेतकऱयांना शेती करणे मुश्कील झाले आहे. विशेषतः महिलावर्गामध्ये कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. वनखात्याने याची दखल घेऊन कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी आम्हा शेतकऱयांची मागणी आहे.