आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा
प्रतिनिधी / पंढरपूर
आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंडय़ा निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱया सर्व वारकऱयांना सोयी-सुविधा देण्यात राज्य शासन कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठलचरणी घातले.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मानाचे वारकरी मुरली नवले, त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांच्या हस्ते करण्यात आली. महापूजेनंतर विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने आयोजित मानाच्या वारकऱयांचा सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वषी 10 लाखांपेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठूनामाचा जयघोष करत मोठय़ा उत्साहाने चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱयांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी, शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासह अन्य सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार असून विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शासन सर्वसामान्याचे आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यादृष्टीने प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले.
राज्यात या वषी पावसाला उशिरा सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्व यंत्रणा सज्ज आहे. चांगला पाऊस पडल्यास चांगले पीक येऊन शेतकऱयांच्या जीवनात समृद्धी येईल. शासन शेतकऱयांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया कुलकर्णी (नागठाणे) यांनी केले.
रुईच्या नवले दाम्पत्याला मिळाला महापूजेचा मान
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांसोबत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान रुई (ता. गेवराई, जि. बीड) येथील मुरली भगवान नवले (52) आणि जिजाबाई मुरली नवले (47) यांना मिळाला. यावेळी नवले यांनी धन्य पावल्याची प्रतिक्रिया दिली.
राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने महापूजा
राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.