चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचे प्रतिपादन : कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन
वार्ताहर / हिंडलगा
गेल्या 66 वर्षांपासून लोकशाही मार्गाने सीमाप्रश्नाचा लढा सुरू आहे. त्यासाठी काही सीमाबांधवांनी बलिदान दिलेले आहे. त्यांचे बलिदान वाया जाणार नाही. सीमाप्रश्नाचा खटला न्यायालयात आहे. न्याय देवता नक्कीच सर्व सीमाबांधवांना न्याय देणार आहे. संघर्ष आणि त्यागाचा प्रतीक असलेला हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा लढा असून सीमाबांधवांना न्याय नक्कीच मिळणार आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रात पुन्हा आवाज उठवू, असे मनोगत चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी हिंडलगा येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना गुरुवारी सकाळी हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश पाटील हुतात्म्यांना अभिवादन करताना बोलत होते.
महाराष्ट्र सरकारकडे तगादा लावू
ते पुढे म्हणाले, सीमाप्रश्न आणि आजरा, चंदगड भागाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जवळचा संबंध आहे. कै. नरसिंह पाटील यांचे सीमालढ्यासाठी मोठे योगदान लाभलेले आहे. 2023 च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत समितीचे उमेदवार रिंगणात उतरले. याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचाही पाठिंबा मिळाला. सीमाभागातले वातावरण ही तापलेले होते. पाच जागांपैकी किमान दोन-तीन तरी उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र काहीजण आमिषाला बळी पडले असल्यामुळे निसटता पराभव पत्करावा लागला. राजकीय जीवनात यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. मात्र आपण खचून न जाता पुन्हा त्याच ताकदीने आणि त्याच जोमाने लढा दिला पाहिजे. सीमाप्रश्नाचा खटला न्यायालयात आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तगादा लावून आपण हा सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करू. सीमाप्रश्नाची सर्व लोकप्रतिनिधींना माहिती देऊन न्यायालयात अधिक पुरावे सादर करून सीमा बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी हुतात्मा स्मारकाचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क
रण्यात आले. त्यानंतर रमाकांत कोंडुसकर, मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, शिवाजी सुंठकर, प्रकाश मरगाळे. मालोजी अष्टेकर, मनोज पावशे, खानापूरचे तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, मुरलीधर पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील आदींच्या हस्ते हुतात्म्यांना पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘अमर रहे अमर रहे, हुतात्मे अमर रहे’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या तसेच ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
…तोपर्यंत रस्त्यावरची लढाई सुऊच
1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि तेव्हापासून सीमाप्रश्नाचा लढा सुरू झाला आहे. 2004 सालात महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला आहे. जोपर्यंत सीमाप्रश्नाची सोडवणूक होत नाही
तोपर्यंत रस्त्यावरची लढाई आपल्याला सुरूच ठेवावी लागणार आहे. कर्नाटक सरकारने सीमाभागातील 865 खेड्यांमध्ये कन्नड सक्ती लागू करू नये हीच आमची मागणी आहे. सध्या ग्रामपंचायतीमध्ये सर्व कागदपत्रे कन्नडमध्ये काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, असे मनोहर किणेकर यांनी सांगितले. एक जून 1986 रोजी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात जे हुतात्मे झालेले आहेत. त्यांचे बलिदान विसरून चालणार नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच या हुतात्म्यांसाठी खरी श्रद्धांजली असणार आहे, असे मनोगत युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांची भेट आम्ही सीमाबांधवांनी घेतली पाहिजे. तसेच सीमाबांधवांनी अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत सीमाप्रश्न सुटेपर्यंत प्रयत्न केलेच पाहिजे, असे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी सांगितले.
एक दिलाने लढ्यासाठी प्रयत्न आवश्यक
सीमाबांधवांमध्ये कोणत्याही पद्धतीचे मतभेद सध्या नाहीत. सर्वजण एकजुटीने सीमाप्रश्नाच्या चळवळीत भाग घेत आहेत. आता महाराष्ट्र सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी आत्मचिंतन करून एक दिलाने या लढ्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता, आहे असे महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर बोलताना म्हणाल्या.
कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात ज्यांनी हौतात्म्य पत्करले आहे, त्या हुतात्म्यांचे बलिदान विसरून चालणार नाही. त्यांनी सांडलेल्या रक्ताची शपथ घेऊन आपण स्रायांनी सीमाप्रश्नासाठी कार्य केले पाहिजे, असे माजी महापौर सरिता पाटील या म्हणाल्या. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, शुभम शेळके आदींचीही भाषणे झाले. यावेळी मनोज पावशे, तालुका पंचायत सदस्य कमल मनोळकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, मधुरा गुरव, ऊपा नावगेकर, प्रिया कुडची, मदन बामणे, महादेव मंगनाकर, डी. बी. पाटील, रामचंद्र कुद्रेमणीकर, चेतन पाटील, आर. के. पाटील, अॅड. एम. जी. पाटील, सुधीर चव्हाण, धनंजय पाटील, आर. आय. पाटील, रामचंद्र मोदकेकर आदींसह सीमाभागातील विविध गावांमधील व शहर परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा समितीच्या वतीनेही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ चौगुले, सचिव श्रीकांत कदम, मनोहर उंद्रे, आनंद पाटील, मयूर अनगोळकर आदी उपस्थित होते.