विजय सरदेसाई यांची जनतेला सूचना
प्रतिनिधी /मडगाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना म्हादई प्रश्ऩावर जागे करण्यासाठी मी गोव्यातील लोकांना येत्या रविवारी संध्याकाळी स्वतःच्या घराबाहेर दिवे आणि मेणबत्त्या पेटवाव्यात तसेच थाळय़ा वाजवाव्यात अशी सूचना करतो, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी म्हादईसंदर्भात जे विधान केले त्याकडे कानाडोळा करताना मुख्यमंत्री त्यावर कोणतेही भाष्य करत नसल्याने गोमंतकीयांना स्वतःच आता म्हादई बचावासाठी लढा उभारावा लागेल, असे सरदेसाई यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोविड महामारीची चाहूल लागली असता या महामारीला पळवून लावण्यासाठी दिवे लावणे, थाळ्या वाजविणे असे प्रकार केंद्र सरकारने जनतेला करण्यास लावले होते. सध्या गोव्याच्या निंद्रिस्त मुख्यमंत्र्यांना जागे करण्यासाठी वरील कृती करण्याची गरज सरदेसाई यांनी प्रतिपादली.
गृहमंत्री हे पंतप्रधानांनंतर दुसऱया क्रमांकावरील नेते आहेत. त्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन म्हादई प्रश्न सोडविताना कर्नाटकला शेतीसाठी म्हादईचे पाणी वळवू दिल्याचे ठामपणे म्हटले आहे. यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया त्वरित येणे आवश्यक होते. मात्र नीलेश काब्राल आणि सुभाष शिरोडकर यांच्यासारख्या मंत्र्यांना पुढे करून आणि त्यांना सहमत नसल्याच्या प्रतिक्रिया द्यायला लावून गोमंतकीयांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
विषय शीतपेटीत टाकण्याची सरकारची इच्छा
सभागृह समितीची बैठक त्वरित बोलाविण्याची गरज होती. पण सरकार 8 फेब्रुवारी रोजी ही बैठक ठेवून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. कारण त्यांना म्हादईचा विषय शीतपेटीत ठेवायचा आहे. कर्नाटकातील निवडणुकीपर्यंत असे प्रकार चालू ठेवून जनतेच्या डोळय़ांत धूळ फेकण्याचे हे प्रयत्न असले, तरी गोमंतकीय जनता सुजाण आहे. ती म्हादई प्रश्नी पेटून उठेल याची जाणीव सरकारने ठेवण्याची गरज आहे, असे सरदेसाई म्हणाले.
माझा पक्ष या प्रश्नावर कोणतीही पावले उचलून राजकीय लाभ उठविणार नाही, तर म्हादईसाठी सुरू असलेल्या चळवळीच्या मंचासोबत आम्ही राहू. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्री चूक म्हणणाऱयांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
सभागृह समिती वा न्यायालयाकडून गोव्याला म्हादईप्रश्नी न्याय मिळेल असे सरकारच्या एकंदर कारभाराकडे पाहिल्यास दिसून येत नाही. त्यासाठी लोकांचा लढा आवश्यक आहे. गृहमंत्री चूक असे जे कुणी आता म्हणत आहेत ते सी. टी. रवी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई तसेच गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते कोणत्या तोंडाने गृहमंत्री चूक म्हणत आहेत. गृहमंत्री चूक असतील, तर या नेत्यांनी राजीनामे देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे. गृहमंत्री खरेच बोलले असे मी म्हणतो, नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर भाष्य करावे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.