प्रतिस्पर्धी अनिश्चित, तरीही संपर्क मोहित गतीमान; महाविकास आघाडी-भाजप युतीमध्ये होणार निकराचा लढा; शिंदे गटातील आमदारांच्या निकालानंतर बरेचसे चित्र होणार स्पष्ट; कर्नाटक राज्यातील निवडणूक निकालाचाही होणार इफेक्ट
कोल्हापूर कृष्णात चौगले
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाचा कालावधी बाकी असला तरी विद्यमान खासदारांसह अन्य इच्छूक उमेदवारांनी मतदारसंघामध्ये संपर्क मोहिम गतीमान केली आहे. अपेक्षीत असलेल्या राजकीय पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही ? आपला प्रतिस्पर्धी कोण असेल ? पुढील वर्षभराच्या कालावधीत जिह्यासह राज्यात आणि देशाच्या राजकारणात कोणते फेरबदल होतील ? याची यत्किंचितही जाणीव नसली तरीही इच्छूक उमेदवारांकडून संपर्क मोहिम गतीमान केली आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांनी विकासकामांच्या जोरावर मतदान मागण्याची तयारी सुरु केली असली तरी आगामी काळात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर दोन्ही लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.
लोकसभेच्या देशातील एकूण 540 जागांपैकी 400 हून अधिक जागांवर कोणत्याही परिस्थितीत भाजप युतीची मोहोर उमटवायची याची भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून युद्धपातळीवर तयारी सुरु आहे. त्यासाठी पक्ष संघटना बांधणीवर भाजपने जोर दिला आहे. ऐनवेळी सहयोगी पक्षाच्या उमेदवारांच्या हाती कमळ देऊन ‘शत प्रतिशत’ भाजप करण्याबाबत प्रमुख नेत्यांचे धोरण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी देशासह राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविला जाणार आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि इतर पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे लोकसभेच्या मैदानात भाजप युती विरोधात महाविकास आघाडी असा निकराचा सामना रंगणार आहे. लोकसभेची एक-एक जागा मिळविण्याचा भाजप युती बरोबरच महाविकास आघाडीने चंग बांधला असल्यामुळे त्यांच्याकडून केवळ निवडणूक लढविण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत.
खासदार मंडलिक यांची विकासकामांच्या मुद्यावर निवडणुकीची तयारी
खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी मतदारसंघात गेल्या वर्षभरात विकासकामांचा धडाका लावला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात निधी पोहोचवण्याचे त्यांनी परिपूर्ण नियोजन केले असून अनेक गावांतील विकासकामे मार्गी लागली आहेत. जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या गावांमध्ये कोणती कामे करण्याची गरज आहे, याचा आढावा घेतला जात असून त्यानुसार त्यांनी आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक विकासकामांच्या जोरावर लढविण्याची त्यांनी तयारी सुरु केली आहे. विकासकामांबरोबरच त्यांनी संपर्क मोहिम देखील गतीमान पद्धतीने राबविली आहे.
माजी आमदार के.पी.पाटील ठरू शकतात ‘डार्क हॉर्स’
गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मतदारसंघातील महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून जिह्यातील शेतकऱ्यांची अर्थिक उन्नती व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक झाल्यास नैसर्गिक न्याय हक्कानुसार कोल्हापूरच्या जागेवर ठाकरे गट दावा करू शकतो. त्यामुळे माजी आमदार संजय घाटगे यांचे नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते. घाटगे यांचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अन्य प्रमुख नेत्यांशी घरोब्याचे संबंध असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो. तसेच ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास ऐनवेळी माजी आमदार के.पी.पाटील हे ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतात. मतदारसंघात त्यांचाही संपर्क चांगला असून त्यांची विचारधारा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी मिळतीजुळती आहे. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार जिह्यातील काही प्रमुख नेतेही लोकसभेच्या आखाड्यात उतरू शकतात.
खासदार मानेंना करावा लागणार राजू शेट्टींचा ‘सामना’
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांनी गत निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. त्यांचा हा विजय राज्यात नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरला होता. पण राज्यातील सत्तांतरानंतर खासदार माने यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी हितासाठी आक्रमणपणे सुरु ठेवलेली चळवळ यामुळे या मतदारसंघातील जनसामान्यांमध्ये एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात खासदार माने यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारकडून मतदारसंघात कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणला आहे. आगामी निवडणूकीत ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतील हे अद्याप स्पष्ट नसले तरी विकासकामांच्या जोरावरच त्यांनी निवडणूकीची तयारी सुरु ठेवली आहे. तसेच ‘राजकारणात कोणी कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो’ याप्रमाणे महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना पाठींबा दिला जाऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीला शेट्टी यांचा फायदा होऊ शकतो.
प्रतिक पाटील, राहूल आवाडे, रणवीर गायकवाड चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. या मतदारसंघातील वाळवा आणि शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघावर आमदार पाटील यांचे वर्चस्व आहे. तर पन्हाळा-शाहूवाडी, शिरोळ, इचलकरंजी मतदारसंघामध्येही त्यांचे चांगले नेटवर्क आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून प्रबळ उमेदवार द्यायचा झाल्यास प्रतिक पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते. जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड यांनीही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुक लढविण्याबाबत तयारी दर्शवली आहे. तर माजी जि.प.सदस्य राहूल आवाडे यांनी देखील भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली असून त्यानुसार त्यांनी वरीष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे.
16 आमदारांच्या निकालानंतर होणार राजकीय स्थित्यंतरे
सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना (शिंदे गट ) आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरु आहे. येत्या काही दिवसांत न्यायालयाकडून याबाबत निकाल होण्याची शक्यता आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या राजकीय परिस्थितीत मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.