देवेंद्राने केलेल्या सन्मानाने भारावून गेलेल्या राजाला मातली म्हणतो, ‘महेंद्राच्या कोणत्या देणगीस तू पात्र नाहीस?’ कारण अनेकदा त्याने देवेंद्रला सहकार्य करून त्याचे भयहरण केले होते, त्यामुळेच देवेंद्राने त्याला आपल्याजवळ अर्ध्या सिंहासनावर बसवून त्याच्या गळय़ात स्वतःच्या गळय़ातील मंदारमाला काढून घातली होती. तरीही राजा नम्रपणे श्रेय नाकारत होता. मातलीबरोबर चालताना तो वाटेतल्या एका वायुप्रदेशाबद्दल विचारतो. मातली ती त्याला देतो. ती ऐकून राजा म्हणतो, ह्यामुळेच माझा अंतरात्मा प्रसन्न झालाय. आपण आता मेघप्रदेशावर आलो आहोत. मातली त्याला अधिकारक्षेत्रात आपण आल्याचे सांगतो. आकाशमार्गे जाताना राजाला वेगाने खाली उतरत असताना पृथ्वीचा देखावा आश्चर्यकारक दिसतो. खूप सुंदर आणि मनोरम दिसत होती पृथ्वी! राजा त्याला पूर्व पश्चिम टोके समुद्रात गेलेला हा पर्वत कोणता ते विचारतो. तेव्हा तो किन्नरांचा हेमकूट पर्वत असल्याचे मातली सांगतो. तिथे मरिचीपुत्र प्रजापती राहतो असे समजते. राजा त्याला भेटण्याची इच्छा प्रकट करतो. असली मंगलधामे ओलांडून जाणे योग्य नाही. भगवंतांना प्रदक्षिणा घालून जाण्याची राजाची इच्छा
होती.
ते दोघे खाली उतरण्याचा अभिनय करतात. तेव्हा उतरताना इथे चाकांची धूळही उडाली नाही याचे राजाला आश्चर्य वाटते. मारीच ऋषिंचा आश्रम दाखवण्यासाठी राजा मातलीला विनंती करतो, तेव्हा तो त्याला तिकडे घेऊन जातो. राजा त्या उग्र तपोनि÷ाला प्रणाम करतो. स्वर्गाहून सुंदर असे ते तपोवन जणू शांतिनिकेतन असते. रथ हलणार नाही अशी तजवीज करून मातलीसह राजा खाली उतरतो. तपोवनाकडे नजर टाकतो. केवळ वायुभक्षण करूनही सुंदर दिसणारी कल्पतरूंची वने त्याला दिसतात. मातली तिथल्या एका वृद्ध अशा व्यक्ती असलेल्या शाकल्याला विचारतो, मारीच ऋषी काय करीत आहेत? तेव्हा दाक्षायणीने पातिव्रत्यधर्मासंबंधी विचारल्या प्रश्नांना उत्तरे देत असल्याचे त्याला समजते. तेव्हा तो अशोकवृक्षाखाली त्यांची वाट पहात थांबण्याचे ठरवतो. मातली निघून जातो.
पडद्यातून राजाच्या कानावर शब्द येतात, ‘नको रे असा अचपळपणा करूस. गेलाच हा आपल्या वळणावर!’ आवाजाच्या दिशेने राजा पाहतो, त्याला छोटय़ा बालकामागे दोन तपस्वीनी धावताना दिसतात. तेव्हा राजाला खूप आश्चर्य वाटते.