महाराष्ट्र अंनिसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीचा पन्हाळ्यात समारोप
कोल्हापूर प्रतिनिधी
शिक्षणाने माणूस शहाणा होईल अशी अपेक्षा होती पण आज समाजात निरक्षर माणसांपेक्षा साक्षर माणसे अधिक अंधश्रद्ध दिसू लागली आहेत. मात्र या अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कठोर न होता अधिक संयमाने आणि आपुलकीने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व परिवर्तनवादी चळवळींचे मार्गदर्शक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा येथे 2 ते 4 जून दरम्यान झाली. यावेळी साळुंखे यांच्यासह विविध विचारवंतांनी मार्गदर्शन केले. साळुंखे यांनी बदलत चाललेला समाज, साक्षर नागरिकांमध्ये वाढत चाललेली अंधश्रद्धा यावर भाष्य करत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्रोही साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीचे उद्घाटन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले. उद्घाटनपर भाषणात डॉ. हिर्डेकर यांनी ‘अंनिस ही विचार करायला शिकवणारी आणि कृतिशील परिवर्तन करणारी चळवळ आहे. शोषण आणि विषमता थांबवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम समाजाने केले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, नंदकिशोर तळाशीलकर, डॉ. ठकसेन गोराणे, गजेंद्र सुरकार, राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे, जिल्हा प्रधान सचिव हरी आवळे, भास्कर सुतार आणि दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे असे भारतीय संविधानाने सांगितले आहे. मात्र आज याच्या उलट स्थिती आहे असे सांगून सरकारकडून अभ्यासक्रमामधून वैज्ञानिक दृष्टिकोनावर मर्यादा घालणे सुरू असून याविरोधात लढा उभारला पाहिजे, असे प्रतिपादन केले. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना संघटनेतील त्यांच्या योगदानाबद्दल लक्षवेधी कार्यकर्ता, लक्षवेधी शाखा आणि लक्षवेधी जिल्हा असे पुरस्कार देऊन सन्मानित केले.
यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते डॉ. माधुरी झाडे लिखित ‘वयात येताना‘ डॉ. नितीन शिंदे लिखित ‘वास्तुशास्त्र‘ आणि डॉ. आ. ह. साळुंखे लिखित ‘शब्दांच्या बाबतीत जे खटकले ते मांडले‘ आणि ‘गयासूर आणि महिषासुर‘ या पुस्तकांचे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र अंनिसच्या हितचिंतकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कॉ. अतुल दिघे, सुरेश शिपुरकर, समाज कल्याण साहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, महाराष्ट्र अंनिसचे दिवंगत कार्यकर्ते के. डी. खुर्द यांचे कुटुंबीय यांच्यासह महाराष्ट्र अंनिसचे अनेक हितचिंतक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र अंनिसच्या युवा कार्यकर्त्यांनी ‘आम्ही प्रकाशबीजे‘ ही रिंगण नाटक सादर केले. रविवार बैठकीचा समारोप झाला. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, कॉ. दिलीप पवार आणि कॉ. एस. बी. पाटील यांचासह महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण बैठकीत महाराष्ट्र अंनिसच्या सर्व एकोणीस विभागांच्या आणि सर्व जिह्यांच्या कामाचा आढावा आणि पुढील कामाचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला महाराष्ट्रभरातून 230 कार्यकर्ते उपस्थित होते.
आठवण भाई, साथींची…..
महाराष्ट्र अंनिसच्या या बैठकीच्या परिसराला भाई एन. डी. पाटील परिसर, साथी विकास सावंत प्रवेशद्वार, अरुणराव पाटील सभागृह, विनायक चव्हाण नोंदणी आणि पुस्तक विक्री कक्ष आणि साथी के. डी. खुर्द विचारमंच अशी अंनिसच्या दिवंगत कार्यकर्त्यांची नावे देण्यात आली होती.