ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यांनतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. शिंदेच्या गोटात आतापर्यंत ४६ आमदार दाखल झाल्याचे समजत आहे. यातच भाजपसोबत (BJP) जाऊन सरकार स्थापन करायचे की नाही; तसेच ते कशा पद्धतीने करायचे यापेक्षा शिवेसना (Shivsena) हा मूळ पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसे येईल, यासाठीच्या कायदेशीर लढाईवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्यासोबत सध्या ४६ च्या वर आमदारांची संख्या आहे. हे सगळं सुरु असताना ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आम्हाला ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवा यासाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती समोर येत आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत असल्याची देखील माहिती आहे.
आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती मिळत आहे.