अर्चना माने-भारती / पुणे :
1 जून ते 16 सप्टेंबरच्या कालावधीत महाराष्ट्रात जोरदार मान्सूनसरी बरसल्या असून, आतापर्यंत सरासरीच्या 25 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. त्यातही वर्धा व नाशिक जिल्हय़ात अतिरिक्त पाऊस झाला असून, बाकीच्या जिल्हय़ात सरासरीपेक्षा अधिक तसेच समाधानकारक पाऊस झाल्याची आकडेवारी हवामान विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रात 16 सप्टेंबरपर्यंत सर्वसाधारपणे 916 मिमी इतका पाऊस होतो. मात्र, आतापर्यंत 1149.7 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. यावर्षी महाराष्ट्रात पाऊस चांगला राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आधीच वर्तविला होता. त्यानुसार राज्यात मान्सून बरसत असून, त्याने सर्वदूर हजेरी लावी आहे. यात बंगालच्या उपसागरातील अनेक कमी दाबाची क्षेत्रे जमिनीवर येत महाराष्ट्राच्या शेजारून गेल्याने महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला आहे. याबरोबरच अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभावही जास्त असल्याने यावर्षी राज्यात जोरदार पाऊस होत असल्याचे दिसत आहे.
अधिक वाचा : राज्यात लम्पी लसीचा तुटवडा नाही, पशुसंवर्धनमंत्र्यांचा दावा
वर्धा व नाशिक जिल्हय़ात आतापर्यंत अतिरिक्त पाऊस झाला असून, दोन्ही जिल्हय़ात सरासरीच्या 62 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. याशिवाय पालघर (सरासरीच्या 35 टक्के अधिक), ठाणे (23), सोलापूर (27), उस्मानाबाद (35), लातूर (34), बीड (30), नगर (36), औरंगाबाद (33), धुळे (42), नंदुरबार (23), नांदेड (52), यवतमाळ (39), नागपूर (56), भंडारा (34), गोंदिया (30), गडचिरोली (35), चंद्रपूर (29) जिल्हय़ात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
साताऱ्यात सरासरीच्या 37 टक्के अधिक पाऊस
पुण्यात सरासरीच्या 41 टक्के, तर साताऱ्यात सरासरीच्या 37 टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, जुलैमध्ये पावसाने कृपा केली, तर ऑगस्टमध्येही समाधानकारक पाऊस झाला. आता सप्टेंबरमध्ये पावसाचे धूमशान सुरू असून, पुणे जिल्हय़ातील जवळपास सर्वच धरणे काठोकाठ भरली आहे. सातारा जिल्हाही पाणीदार झाला असून, कोयनेच्या क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापुरात 19 टक्के अधिकचा पाऊस
याबरोबरच मुंबई (15), रायगड (3), रत्नागिरी (7), सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (19), सांगली (उणे 8), जळगाव (9), जालना (11), परभणी (13), हिंगोली (उणे 9), वाशिम (8), अकोला (उणे 5), बुलढाणा (2), अमरावती (19) जिल्हय़ात सरासरीच्या आसपास पाऊस नोंदविण्यात आला आहे. कोल्हापुरात पावसाची आबादानी असताना सांगली जिल्हा मात्र अजून उणेमध्ये आहे.
सोलापूर, औरंगाबादेतही चांगला पाऊस
मराठवाडा तसेच सोलापूर जिल्हा पावसाच्या बाबतीत दुष्काळी ठरतो. या भागात पाऊस कमी झाल्याने धरणसाठा मर्यादित राहतो. पुणे परिसरातील पावसाने उजनी, तर नाशिक परिसरातील पावसाने जायकवाडीचा साठा वाढतो. पाऊस मर्यादित असल्यास शेती, पिण्याचे पाणी यावर मोठय़ा प्रमाणात याचा परिणाम होत असतो. यंदा मात्र या भागातही चांगला पाऊस झाला असून, धरणेही तुडुंब भरली असल्याचे चित्र आहे.