पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील आत्ताची महाविकास आघाडी वास्तविक 2009 लाच साकारणार होती. त्यावेळी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली होती. शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी युती केली जाणार होती. मात्र, फक्त शिरुर लोकसभेमुळे ती अडली, असा गौप्यस्फोट माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी येथे केला.
शिवसेनेतून 12 खासदार फुटले असतानाच माजी खासदार असलेल्या आढळराव यांनीही आता शिंदे गटासोबत जाणे पसंत केले आहे. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यावर शिंदे यांना आढळराव यांनी शुभेच्छा संदेश दिला होता. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावर मातोश्रीवर जात त्यांनी आपली तक्रार मांडली. त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. मात्र, राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत आढळराव यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असून, लांडेवाडी येथे झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबतची घोषणा केली.
आढळराव म्हणाले, शरद पवार 2009 साली शिरुर लोकसभा मतदारसंघातून लढणार होते. त्याबदल्यात मला राज्यसभा खासदार करणार होते. मात्र, आपण त्यास नकार दिला व बाहेर पडलो. त्यामुळे तेव्हा होऊ पाहत असलेली महाविकास आघाडी प्रत्यक्षात येऊ शकली नाही. ज्या पक्षाबरोबर इतकी वर्षे लढाई केली. त्यांच्यासोबत राहणे योग्य वाटत नाही. आता राष्ट्रवादी आणि शिवसेना युती फायनल झालेली आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे.
दुसऱ्या बाजूला माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न झाला. संजय राऊत यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा, असे सांगितले. मात्र, ज्यांच्याविरोधात तीन वेळा निवडून आलो, त्यांच्याविरोधात पुन्हा जाणे मनाला पटणारे नाही. त्यामुळे शिंदे गटात जात असल्याचे सांगत आजही आम्ही मनाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत, असे आढळराव पाटील यांनी नमूद केले.
शिरूरमधील समीकरणे बदलणार
शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हे सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव यांना अस्मान दाखविले होते. त्यामुळे 2024 चा विचार करीत आढळराव यांनी शिंदे गटात सामील होण्याची भूमिका घेतली आहे. 2024 साठी येथून भाजपाकडून आमदार महेश लांडगे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, आढळरावांच्या नव्या भूमिकेमुळे येथील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : कोकण-गोवा, विदर्भात पावसाचा जोर