मडगाव येथे काँग्रेसतर्फे ‘घटकराज्य दिन’ साजरा : सेंगोलद्वारे सत्ता हस्तांतरित करण्यासाठी देशात राजेशाही नाही : काँग्रेस नेत्यांकडून भाजपवर जोरदार टीका
पणजी : सेंगोल’चा वापर करून सत्ता हस्तांतरित करण्यासाठी देशात राजेशाही अस्तित्वात नाही, हा अधिकार कर्नाटकातील लोकांना भाजपला घरी पाठवून दाखविला आहे अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मंगळवारी केली. मडगाव येथे ‘घटकराज्य दिन’ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार एदुआर्द फालेरो, खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार अॅड. कार्लूस फॅरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम के शेख, अमरनाथ पणजीकर, महिला प्रमुख बीना नाईक, कॅप्टन विरिएटो फर्नांडीस, जिल्हाध्यक्ष वीरेन शिरोडकर आणि सावियो डिसिल्वा, सेवादल प्रमुख जयदेव प्रभुगावकर, नौशाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
एदुआर्द फालेरो यांचा योगदानाबद्दल सत्कार
यावेळी एदुआर्द फालेरो यांना घटकराज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा काँग्रेस नेत्यांनी यावेळी सत्कार केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेले चांगले संबंधाचा योग्य प्रकारे करून राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घटक राज्याचा दर्जा मिळवून देण्यात फालेरो यांनी महत्त्वाची भूमिका बजावली हा अभिमानाचा क्षण आहे, असे अमित पाटकर म्हणाले. काँग्रेस नेते खासदार फ्रन्सिस सार्दिन, माजी खासदार एदुआर्द फालेरो आणि स्व. शांताराम नाईक यांनी केंद्रीय नेत्यांसह राज्यत्वासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे ते यावेळी म्हणाले.
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाबाबत बोलताना पाटकर म्हणाले, ‘सेंगोलने अधिकार हस्तांतरित करण्यासाठी देशात राजेशाही नाही, हा अधिकार कर्नाटकातील लोकांनी वापरून भाजपला घरची वाट दाखवली आहे. मोदींनी नेहमीच लोकांना दिशाभूल करण्याचा आणि नको असलेल्या गोष्टींनी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला आहे,” असे ते म्हणाले. पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे राज्याला पोर्तुगिजांपासून मुक्ती मिळवण्यास विलंब लागला असे भाजपने चुकीचे विधान केले आहे. भाजपवाले चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. गोव्याची संस्कृती आणि शांतता जपण्यासाठी लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मुक्तीनंतर गोव्यात बराच विकास झाला आहे. ओपिनियन पोल दरम्यान लोकांनी आमच्या अस्मितायेचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि विलीनीकरणाच्या विरोधात मतदान केले, असे एदुआर्द फालेरो म्हणाले.
स्टील प्लांटसाठी म्हादई वळविण्याचा घाट : सार्दिन
गोव्यासाठी घटकराज्य दिन हा मोठा आहे. आम्ही ओपिनियन पोल दरम्यान विलीनीकरणाच्या विरोधात लढलो आणि आमची ओळख जपली. पुढे राजीव गांधींच्या प्रयत्नांने आमची मातृभाषा कोकणी भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि आम्हाला घटकराज्याचा दर्जाही मिळाला, असे फ्रन्सिस सार्दिन यांनी सांगितले. कर्नाटकातील स्टील प्लांटसाठी भाजप सरकारने म्हादई नदी वळवल्याचा आरोप सार्दिन यांनी केला. काँग्रेसने पोर्तुगिजांपासून मुक्ती आणि घटकराज्याचा दर्जा मिळवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. भाजप आमच्या देशात धर्म, प्रादेशिक धर्तीवर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते मणिपुरचे विभाजन करण्याचाही प्रयत्न करत आहेत, असा आरोप अॅड. कार्लूस फेरेरा यांनी केला. एम के शेख, बीना नाईक, विरियटो फर्नांडिस आदींची भाषणे झाली. अमरनाथ पणजीकर यांनी सूत्रसंचालन केले. एम के शेख यांनी स्वागत केले, तर सावियो डिसिल्वा यांनी आभार मानले.