संयुक्त राष्ट्रसंघाचा चिंता वाढविणारा अहवाल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिमालयातील प्रमुख नद्या सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रेची पाणीपातळी वेगाने कमी होणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुतेरेस यांनी दिला आहे. 2050 पर्यंत 170 ते 240 कोटी शहरी लोकांना यामुळे पाण्याच्या कमतरतेला सामोरे जावे लागणार आहे. यामागील कारण हिमालयातील हिमखंड वाढणाऱया तापमानामुळे वेगाने वितळणे असणार आहे. पृथ्वीवर हिमखंडांचे अस्तित्व मानवी सृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या पृथ्वीच्या 10 टक्के हिस्स्यांवर हिमखंड आहेत. परंतु जागतिक तापमानवाढीमुळे हे हिमखंड वेगाने वितळू लागले आहेत. अंटार्क्टिका दरवषीं 1500 कोटी टन बर्फ गमावत आहे. ग्रीनलँड 2700 कोटी टन बर्फ दरवर्षी गमावत आहे. या दोन्ही ठिकाणांनंतर सर्वाधिक हिमखंड हिमालयात असून ते देखील वेगाने वितळत असल्याचे गुतेरेस यांनी म्हटले आहे. आशियामध्ये हिमालयातून 10 प्रमुख नद्यांचा उगम होतो, तसेच या नद्यांमुळे 130 कोटी लोकांना पेयजलाचा पुरवठा होत आहे. हिमखंड वितळण्याचा सर्वाधिक प्रभाव गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह तसेच पाणीपातळीवर पडणार आहे. याचबरोबर वेगाने हिमखंड वितळू लागल्यास पाकिस्तान आणि चीनमध्ये मोठे पूरसंकट निर्माण होण्याचा धोका आहे.
गंगा आटल्यास काय होणार?
गंगा ही भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. गंगा नदी सुमारे 2500 किलोमीटरपर्यंत वाहते. गंगेतील पाण्यावर अनेक राज्यांमधील सुमारे 40 कोटी लोक अवलंबून आहेत. गंगा नदीला पाण्याचा मुख्य पुरवठा गंगोत्री हिमनदीतून होत आहे. परंतु तेथील हिमखंड धोक्यात आला आहे. मागील 87 वर्षांमध्ये 30 किलोमीटर लांबीच्या हिमखंडातील 1.75 किलोमीटरचा हिस्सा वितळला आहे. भारतीय हिमालयीन क्षेत्रात 9575 हिमखंड असून यातील 968 हिमखंड एकटय़ा उत्तराखंडमध्ये आहेत. गंगा, घाघरा, मंदाकिनी, सरस्वती यासारख्या नद्या भारतातील मैदानी भागांचे एकप्रकारे पोषण करत आहेत. परंतु ज्या प्रकारे जागतिक तापमानवाढ आहे ते पाहता या नद्यांची पाणीपातळी कमी होणार आहे, या नद्यांना पाणी पुरविणारे हिमखंड आता वितळू लागले आहेत.
1700 मीटर मागे गेले गोमुख
गंगोत्री ग्लेशियरच्या मुखावर गोमुख आहे. येथूनच गंगा नदी बाहेर पडते. देहरादून येथील वाडिया इन्स्टीटय़ूट ऑफ हिमालय जियोलॉजीचे वैज्ञानिक डॉ. राकेश भाम्बरी यांनी यासंबंधी अध्ययन केले आहे. 1935 पासून 2022 पर्यंत गंगोत्री ग्लेशियरच्या मुखाचा हिस्सा 1700 मीटरपर्यंत वितळला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामागे हिमवृष्टी कमी होणे हे देखील कारण आहे. हिमालयीन भागांमध्ये तापमानवाढीचा किती आणि कुठे परिणाम होणार हे आताच सांगता येणार नाही. परंतु गंगोत्रीच्या वितळण्याचा वेग खूपच अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमधील सर्वात मोठे ग्लेशियर
गंगोत्री हे उत्तराखंडमधील सर्वात मोठे ग्लेशियर आहे. 30 किलोमीटर लांब अन् 143 चौरस किलोमीटर इतके याचे क्षेत्रफळ आहे. याच्या एका टोकाला 3950 फुटांच्या उंचीवर गोमुख आहे. तेथूनच भगिरथी नदी बाहेर पडते. तर देवप्रयागमध्ये अलकनंदासोबत संगम झाल्यावर याला गंगेचे स्वरुप मिळते. 2001-2016 दरम्यान गंगोत्री ग्लेशियरने 0.23 चौरस किलोमीटरचा भाग गमावला आहे.