राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालासून स्पष्ट
प्रतिनिधी /पणजी
जगभरातील पर्यटकांना खुणावणाऱया गोव्यातील समुद्रांचे पाणी अत्यंत प्रदूषित बनले असल्याचे प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाच्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील समुद्रकिनारे आता पोहण्यासाठी सुरक्षित राहिलेले नाहीत असे स्पष्ट झाले आहे.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार मोरजी, मिरामार, कळंगुट, तेरेखोल, वागाथोर, मोबोर, बायणा, वेळसांव आणि गालजीबाग आदी प्रसिद्ध किनारे मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणातील कोलिफॉर्ममुळे सर्वाधिक प्रदूषित बनले आहेत.
याव्यतिरिक्त, वरीलपैकी काही ठिकाणी पाण्याच्या बायोकेमिकल (बीओडी) ऑक्सजिन डिमांड च्या संदर्भात विहित मर्यादेचे पालन करण्यात आले नसल्याचे दर्शविते. त्यावरून या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता समाधानकारक नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मंडळाच्या या अभ्यासात बायोकेमिकल ऑक्सजिन डिमांड (बीओडी), डिसॉल्व ऑक्सजिन (डीओ) तसेच अन्य कोलिफॉर्म आणि अन्य 45 प्रमुख निर्देशकांच्या संदर्भात पाण्याच्या गुणवत्तेभोवती फिरले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण तसेच वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयालाही याची माहिती देण्यात आली होती. टार बॉल्सचा मुद्दा गांभीर्याने घेत राष्ट्रीय हरित लवादाने एक समिती स्थापन केली असून त्या समितीने तांत्रिक उपसमिती स्थापन केली आहे.
राज्यातील समुद्रकिनाऱयांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले असून किनाऱयांवर निर्माण होणारा कचरा गोळा करून नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. परंतु किनाऱयावरील हॉटेल्स आणि अन्य आस्थापने तसेच तरंगत्या पॅसिनोंमधून बेकायदेशीररित्या सोडण्यात येणाऱया मल आणि अन्य सांडपाण्यामुळे समुद्राचे पाणी मर्यादेबाहेर प्रदूषित झाले आहे. त्यावर वेळीच आवर आणि उपाययोजना घालण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात यापेक्षाही वाईट स्थिती उद्भवणार व परिणामी पर्यटक किनाऱयांकडे पाठ फिरवतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या स्वच्छता अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या समुद्रकिनाऱयांमध्ये उत्तर गोव्यातील केरी, हरमल, मांदे, आश्वे, मोरजी, अंजुना, बागा, कळंगुट, कांदोळी, सिकेरी, नेरुल, मिरामार, करंझाळे, सिरदोन, बांबोळी तर दक्षिण गोव्यातील बायणा, हॉलांत, बोगमाळो, वेळसांव, आरोसी, उतोर्डा, माजोर्डा, बेतालभाटी, कोलवा, सेर्नाभाटी, बाणावली, फात्राडे, वार्का, केळशी, मोबोर, आगोंदा, पाळोळे, पाटणे, राजबाग, तळपण, गालजीबाग यांचा समावेश होतो.