राज्य सरकारकडून अधिकृत आदेश जारी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील काँग्रेस सरकारची दुसरी गॅरंटी असलेल्या गृहलक्ष्मी योजनेबाबत बुधवारी अधिकृत आदेश निघाला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील मुख्य गृहिणीला दरमहा 2,000 रुपये अनुदान दिले जाणार असून याचा लाभ घेण्यासाठी सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढविण्यासाठी गृहिणीला दरमहा 2,000 रुपये देण्याची गृहलक्ष्मी योजना सुरू करण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली होती. त्याला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. यासंबंधी बुधवारी सरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांनी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत अर्ज करावेत. त्यानंतर 15 जुलैपासून अर्ज छाननी करून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी जमा केला जाईल. अर्जदारांना सेवा सिंधू पोर्टलद्वारे किंवा प्रत्यक्षरित्या अर्ज करण्याची परवानगी आहे.
चुकीची माहिती दिल्यास कारवाईचा इशारा
योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांना स्वयंघोषणेच्या आधारावर मंजुरी दिली जाईल. त्यानंतर अर्जातील घटकांची छाननी केली जाणार असून चुकीची माहिती देऊन या सुविधेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास जमा केलेली रक्कम अर्जदाराकडून वसूल केली जाईल. अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
‘गृह ज्योती’ योजनेंतर्गत भाडेकरूंना मोफत वीज मिळणार नाही, असे राज्य सरकारने मार्गसूचीत म्हटले होते. पण यानंतर झालेल्या गोंधळानंतर सरकारने आदेशात सुधारणा केली होती. आता सरकारने ‘गृहलक्ष्मी’ गॅरंटीमध्येही अटींद्वारे जनतेला शॉक दिला आहे.
योजनेतील मुख्य अटी…
- अन्न व नागरी पुरवठा खात्याने वितरित केलेल्या अंत्योदय, बीपीएल आणि एपीएल शिधापत्रिकेमध्ये कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख केलेली महिला या योजनेची पात्र लाभार्थी आहे.
- एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला असल्यास ही योजना फक्त एका महिलेसाठी लागू होईल.
- या योजनेच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करावे.
- घरातील मुख्य गृहिणी किंवा तिचा पती प्राप्तिकर भरत असेल तर ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
- घरातील मुख्य गृहिणी किंवा तिचा पती जीएसटी रिटर्न भरणा करत असल्यास या योजनेसाठी पात्र नाहीत.