दशकांची चर्चा फळली, ऐतिहासिक महासागर करार अस्तित्वात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दशकांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर जवळपास सर्वच देशांनी महासागरांच्या सुरक्षेसाठी महासागर करार केला आहे. द हाय सीज ट्रीटी नावाच्या या कराराचा उद्देश 2030 पर्यंत जगातील 30 टक्के समुद्रांना संरक्षित क्षेत्र घोषित करणे आहे. तसेच सागरी वातावरणाचे संरक्षण करणे आणि सागरी जीवांना पुन्हा स्वतःची संख्या वाढविण्याची संधी देणे या हा करारामागील मुख्य उद्देश आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात दीर्घकाळ झालेल्या चर्चेनंतर हा करार अस्तित्वात आहे. मासेमारीचा अधिकार आणि निधीवरून वादामुळे यासंबंधीची चर्चा अनेक वर्षांपासून रखडली होती. यापूर्वी महासागर करार 1982 मध्ये म्हणजेच 40 वर्षांपूर्वी झाला होता. या कराराला समुद्रविषयक कायद्यावरील संयुक्त राष्ट्रसंघ अधिवेशनाचे नाव देण्यात आले होते. त्या कराराच्या अंतर्गत समुद्रातील हाय सीज नावाच्या एका भागाची ओळख पटविण्यात आली होती. हाय सीज हे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र असून तेथे जगातील प्रत्येक देशाकडे मासेमारी करण्याचा अधिकार होता.
हाय सीजमध्ये कुठलाही देश जहाज पाठवून संशोधन कार्य करू शकतो. परंतु हाय सीजच्या अंतर्गत निर्धारित भागांपैकी केवळ 1.2 टक्के क्षेत्रालाच संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. या संरक्षित क्षेत्राबाहेर राहत असलेल्या जीवांवर हवामान बदल, अधिक मासेमारी आणि जहाजांच्या वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन)नुसार जागतिक सागरी प्रजातींपैकी 10 टक्के जीव विलुप्त होण्याचा धोका आहे.
दशकांच्या चर्चेनंतर संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य देश अखेर राष्ट्रीय सीमेबाहेरील सागरी जीवसृष्टी वाचविण्यावर सहमत झाले आहेत. हाय सीज ट्रीटीमुळे आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील 30 टक्के भाग संरक्षित क्षेत्र घोषित होणार आहे. तसेच सागरी जीवांच्या संरक्षणासाठी अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. याचबरोबर सागरात उत्खनन करण्यासंबंधी नवे नियम लागू केले जाणार आहेत. या करारामुळे धोक्यात असलेले सागरी जीव वाचविण्यास मदत होत शाश्वत विकास सुनिश्चित करता येणार असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी म्हटले आहे.
हाय सीज म्हणजे काय?
– एकूण सागरी क्षेत्राच्या दोन तृतीयांश भाग आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र मानला जातो.
– या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात सर्वांना मासेमारी, वाहतूक, संशोधनाचा अधिकार.
– आंतरराष्ट्रीय जलक्षेत्राच्या केवळ एक टक्के भाग होता संरक्षित क्षेत्र.
– हाय सीजमधील बहुतांश जीवांना मासेमारी, उत्खननामुळे मोठा धोका.
कुठले जीव धोक्यात?
नव्या आकलनानुसार 10 टक्के सागरी जीव हे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अतिरिक्त मासेमारी आणि प्रदूषणामुळे हे जीव संकटात सापडले आहेत. सागरी अभयारण्य निर्माण करण्यात आल्यास या जीवांना स्वतःचे अस्तित्व टिकविता येणार असल्याचे सागरी संशोधक डॉ. न्गोजी ओगुगोच यांनी म्हटले आहे. शेलफिश, शार्क आणि व्हेल माशाच्या प्रजाती सध्या संकटात सापडल्या आहेत. तर 40 टक्के प्रजाती हवामान बदलामुळे प्रभावित झाल्या आहेत.