भाजपा राज्य उपाध्यक्ष वाय. बी. विजयेंद्र यांचे प्रतिपादन : बिळकी-अवरोळी रुद्रस्वामी मठात विविध कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /खानापूर
विविध मठांमध्ये तेथील मठाधिशांनी समाजाच्या प्रगतीसाठी ज्ञानदान, विद्यादान, अक्षरदासोहच्या माध्यमातून उपाशीपोटी लोकांना अन्न व शिक्षणाची गरज असलेल्यांना उच्चशिक्षण दिले. त्यामुळे मठात राहून शिकलेल्या गोरगरिबांची अनेक मुले आज मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. रुद्रस्वामी मठाचे मठाधीश वयाने लहान असले तरी त्यांची धडपड उल्लेखनिय आहे. परिसरातील जनतेची मोठी साथ लाभत आहे. आपणही या मठाचा भक्त आहे. या मठांची उन्नती होऊन समाजासाठी उपयोग व्हावा, असा अभिप्राय भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष वाय. बी. विजयेंद्र यांनी व्यक्त केला. बिळकी-अवरोळी येथील रुद्रस्वामी मठावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रुद्रस्वामी मठाचे मठाधीश चन्नबसव देवरु होते. य् ाावेळी हिरेमुन्नवळी शांडिलेश्वर मठाचे शंभुलिंग शिवाचार्य स्वामी, मुक्तीमठाचे शिवसिद्ध सोमेश्वर स्वामी, नेरडगुप्प मठाचे पंचमसिद्धलिंग स्वामी, कल्लूर अडिवेश्वर मठाचे शंभुलिंग स्वामी, केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे, विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, बेंगळूर विकास प्राधिकाराचे आयुक्त गिरीश होसूर, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा नेते प्रमोद कोचेरी, जोतिबा रेमाणी, सुभाष गुळशेट्टी, राज्य वननिगमचे संचालक सुरेश देसाई, डॉ. रवि पाटील, माजी केपीसीसी सदस्य शंकर होळी, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, दशरथ बनोशी आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे म्हणाले, खानापूर तालुका मागास तालुका आहे. येथील लोकांना उपचारासाठी बेळगावला यावे लागते. यासाठी वेळ व पैसा खर्च होतो. येथील लोकांच्या सोयीसाठी महिन्यातून एकदा खानापुरातील विविध भागात केएलईचे आरोग्य पथकच (डॉक्टर) पाठविणार असल्याचे आश्वासन दिले. गिरीश होसूर म्हणाले, खानापूरच्या विकासासाठी शैक्षणिक बदल व्हायला हवा, औद्योगिक क्रांती व आरोग्य सुविधेसाठी सरकारने पावले उचलावित. तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांनी गो शाळा निर्माण करण्यासाठी मठाला दोन एकर जागा देण्याचे जाहीर केले. यावेळी महांतेश कवटगीमठ, संजय कुबल, शंकर होळी, प्रमोद कोचेरी, सुभाष गुळशेट्टी आदीनी विचार मांडले. रुद्र स्वामी मठाचे मठाधीश चन्नबसव देवरु म्हणाले, आजच्या युवकांनी भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी जन्मदात्या आई, वडिलांना देव म्हणून त्यांचा मानसन्मान ठेवावा. धनसंपत्ती, शिक्षण सर्व काही मिळत असले तरी आपली संस्कृती कायम टिकवून ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. य् ाा भागातील शेकडो युवकांनी हातात भगवे झेंडे घेऊन वाजत-गाजत मठाच्या पायथ्यापासून मठापर्यंत उपस्थित मान्यवरांचे मिरवणुकीने स्वागत कले. या कार्यक्रमाला परिसरातील पाच हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते. यावेळी झाडांच्या रोपांचे वाटप व आरोग्य शिबिर तर रात्री मनोरंजनपर भरतनाट्या व शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. कार्यक्रमानिमित्त मठाच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.