ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल असे वाटत नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीने सत्ता परिवर्तन सभा आयोजित केली होती. या सभेला संबोधित करताना आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसह भाजपावरही निशाणा साधला. आंबेडकर म्हणाले, कोणासोबत युती करायची, कोणासाबेत नाही हे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री ठरवतात. ते कठपुतलीप्रमाणे सर्वांना नाचवत आहेत. भविष्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने मविआत भांडणे होतील. सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात ते एकत्र राहू शकणार नाहीत.
मविआने अद्याप आम्हाला त्यांच्यासोबत घेतलेले नाही. मात्र, त्यांनी त्यांच्यात तरी समझोता तरी करावा. लोकसभेच्या 48 जागांचे जे तुम्ही वाटप करणार आहात, त्यासाठी तरी एकत्र या, असा सल्लाही आंबेडकर यांनी मविआच्या नेत्यांना दिला आहे.