भारतीय रुपयाच्या घसरणीवर सार्वत्रिक चिंता व्यक्त होत असतानाच ‘रुपया घसरलेला नाही, तर अमेरिकी डॉलर अधिक सशक्त झाला आहे,’ हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे विधान भुवया उंचावणारे म्हणता येईल. मागच्या काही दिवसांपासून रुपयाचे वेगाने अवमूल्यन होत असल्याचे दिसू येते. गेल्या महिन्याच्या अखेरीस रुपयाचे मूल्य 84 पैशांनी घसरले. तर दोन दिवसांपूर्वी 8 पैशांनी घसरून हे मूल्य 82.32 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले. त्यामुळे या पडझडीबद्दल अर्थतज्ञांकडून चिंता प्रकट होणे स्वाभाविक म्हणावे लागेल. आठ वर्षांपूर्वी एका डॉलरची किंमत साधारण 63.33 रुपये इतकी होती. 2019-20 पर्यंत हे मूल्य 70 रुपयांपर्यंत सीमित होते. तथापि, मागच्या दोन वर्षांत हा दर 82 रुपयांवर पोहोचत असेल, तर त्याचा वास्तववादी विचार करणे क्रमप्राप्त ठरते. खरे तर निर्मला सीतारामन यांच्या म्हणण्यात अजिबातच तथ्य नाही, अशातला भाग नव्हे. त्या म्हणतात त्यातही थोडा फार तथ्यांश आहेच. परंतु, डॉलर मजबूत होत असताना रुपयादेखील कमकुवत आहे, हेही आपणास विसरून चालणार नाही. नेमके हे वास्तव स्वीकारणे, ही आजच्या घडीला गरजेचे म्हणावे लागेल. जगभरातील इतर चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची कामगिरी चांगली आहे, असे अर्थमंत्री म्हणतात. आपल्या शेजारील देशांकडे पाहिले, तर आपण खरोखरच खूप मजबूत स्थितीत असल्याची खात्री पटते. पाकिस्तानमध्ये एका डॉलरची किंमत 218 पाकिस्तानी रुपये इतकी आहे. तर श्रीलंकेत 365 श्रीलंकन रुपये, नेपाळमध्ये 131, तर बांग्लादेशात 104 रुपयांपर्यंत आहेत. तर चायनामध्ये एका यूएस डॉलरचे मूल्य 7.18 चिनी युआनइतके दिसून येते. म्हणजे शेजारील चीन याबाबतीत आपल्यापेक्षा तगडा असल्याचे आकडेवारी सांगते. याखेरीज युरो, ब्रिटिश पाऊंड, ऑस्ट्रेलियन डॉलर, केनेडियन, सिंगापूर डॉलर, स्वीस व मलेशियन करंसी आपल्या तुलनेत अधिक कमकुवत झाल्याचे सांगितले जाते. अर्थमंत्र्यांना या सगळय़ाकडेच अंगुलीनिर्देश करायचा असावा. डॉलरनंतर जगभरात युरो हे चलन सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. युरो हे चलनात आल्यानंतर पाउंडची क्रेझ वा वापर नक्कीच कमी झाला आहे. त्याचे सांप्रत मूल्य घटल्याकडे लक्ष वेधण्यात काही गैर नाही. मागच्या दोन ते तीन वर्षांत कोरोना आपत्ती व रशिया व युक्रेन युद्धामुळे अख्खे जग पोळून निघाले आहे. सर्वच देशांवर या सगळय़ा महासंकटांचे गंभीर परिणाम झाले आहेत. स्वाभाविकच चलन घसरणीसही हा घटक मोठय़ा प्रमाणात कारणीभूत ठरलेला दिसतो. पण, म्हणून केवळ डॉलरच मजबूत झाला व इतर चलनांमध्ये आपल्यापेक्षा अधिक घसरण झाली, ही मांडणी व्यावहारिक ठरत नाही. आपल्याला या साऱयातून काय मार्ग काढता येईल, कोणत्या उपाययोजना करता येतील, आर्थिक सुधारणांसाठी प्राधान्याने कोणती पावले उचलावी लागतील, हे पहायला हवे. अर्थात हे सारे करण्यासाठी सर्वप्रथम प्रांजळपणे वास्तवाचा स्वीकार करणे, ही आजची गरज म्हणता येईल. 2008 मध्ये अवघ्या जगाला महामंदीने ग्रासले होते. मंदीच्या कचाटय़ात अनेक देश सापडलेले असताना भारतासारखा देश मात्र त्यापासून सुरक्षित राहू शकला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी वास्तवाचा स्वीकार करत गंभीरपणे राबविलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले होते. भारतीय अर्थव्यवस्थेची म्हणून काही बलस्थाने निश्चितपणे आहे. ही बलस्थाने मनमोहनसिंग यांच्यासारखा द्रष्टा तज्ञ ओळखून होता. आजदेखील ही शक्तिस्थळे ओळखून आपल्याला पावले टाकावी लागतील. कारण, अशा संकटांमध्येही तगण्यासाठी तीच उपयोगी पडतील. रुपयाचे अवमूल्यन ही वरकरणी साधारण बाब वाटत असली, तरी त्याचे एकूण देशाच्या अर्थ व्यवहारावर गडद परिणाम होत असतात. आता डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने क्रूड तेलाची आयात करणे आणखी महाग होऊ शकते. स्वाभाविकच पेट्रोल, डिझेलसह एकूणच इंधनाच्या दरात वाढ संभवते. भारतासारख्या देशात खाद्यतेलाची मोठय़ा प्रमाणात आयात केली जाते. साधारणपणे आपण 70 टक्क्यांवर खाद्य तेल आयात करतो. मुळात ही खरेदी आपण डॉलरमध्ये करतो. अशा स्थितीत रुपया कमजोर झाला, तर देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात. मधल्या काळात खाद्यतेलाच्या किमतीचा भडका उडाला. वर्षा, दीड वर्षांत या किमती जवळपास दुपटीने वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. मात्र, त्यानंतर आयात शुल्क रद्द करण्यासह विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे लिटरमागे 20 ते 30 रुपयांनी किमती घटल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला. या किमती पुन्हा वाढल्या, तर जगण्याची लढाई आणखी कठीण बनेल. याखेरीज वैद्यकीय खर्च व परदेशातील शिक्षण महागण्यासह अनेक घटकांवर रुपयाच्या घसरणीचा परिणाम होण्याची भीती आहे. वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ, जागतिक अस्थिरता, परकी गुंतवणूकदारांनी सातत्याने भारतीय शेअरमधून निधी काढून घेणे, यांसारख्या कारणांमुळेही रुपयाची सातत्याने घसरण होत असल्याचे सांगण्यात येते. खरे तर महागाई आणि रुपयाचे घसरते मूल्य हे दोन्ही घटक परस्परांवर परिणाम करत असतात. म्हणूनच आता महागाई नियंत्रणात ठेवणे आवश्यक होय. आज किरकोळ महागाईचा दर 7.41 टक्क्यांवर पोहोचला असून, सामान्यांच्या खिशालाच याची झळ बसते आहे. हे पाहता रिझर्व्ह बँकेचे ‘महागाईविरूद्धचा लढा कठोर आणि दीर्घकाळ चालणारा असेल,’ हे म्हणणे महत्त्वपूर्ण. संकटातही संधी असते, असे म्हणतात. त्या अर्थी निर्यात ही आजघडीची संधीच. स्वाभाविकच रुपयाच्या अवमूल्यनाचा वा घसरणीचा अर्थ समजून, उमजून घेऊन योग्य दिशेने पावले टाकली, तर आपण यातूनही तरून जाऊ.
Previous Articleनेदरलँड्सचा सलग दुसरा तर लंकेचा पहिला विजय
Next Article रशियात लढाऊ विमान कोसळले, 13 जणांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.