त्या दिवशी माझी मैत्रीण मला म्हणाली, अगं ती म्हणत होती तू तिला अजिबात आवडत नाहीस. मला ना खूप राग आला बघ. मी हसून म्हटलं. अगं चालायचंच.. चालायचंच कसं म्हणतेस? इतकी वर्षे एकत्र आहोत, आवडत नाही म्हणजे काय?मी पुन्हा हसले..तू कशी काय एवढी शांत राहतेस गं?
बरं! मग मी काय करायला हवं.. तू ना, तिला खरमरीत जाब विचार. त्याने काय साध्य होणार? काही नाही. पण निदान आपल्या मनाला जाब विचारल्याचे समाधान. मला परत हसायला आलं. स्नेहा वैतागली.
अगं बाई..तू कशाला एवढी चिडतेस? चिडचिड करून काय होणार? आणि मुळात आपण सर्वांच्या गुडबुकमध्येच असायला हवं हा अट्टहास कशासाठी? आपल्यालाही कुणीतरी कमी, अधिक आवडतंच की.. एखाद्याजवळ बोलावंसं वाटतं. एखाद्याजवळ नाही वाटत. त्यात काय आहे एवढं? हे बघ आपण सदैव सगळ्यांना खूष करू शकत नाही हे तर उघडच आहे. तेव्हा अमुक एखादा माझ्यावर खूष नाही किंवा अमुक एखाद्याला मी आवडत नाही याचे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. कठीण आहे तुझं.. असे म्हणत स्नेहा शांत बसली.
बऱ्याचवेळा आपण सर्वांच्या गुडबुकमधेच असायला हवे, सर्वांनी मला चांगलेच म्हणायला हवे या अट्टहासातून ताण तणावाला सामोरी जाणारी अनेक माणसे पहायला मिळतात. मुळात सगळ्यांनाच आपण आवडायला हवे ही अपेक्षा असणे बरोबर नाही. आपल्याला कुठे एकूण एक सगळी माणसे आवडतात? आपल्याला कुठे सगळ्यांचीच मते पटतात? असे असणे शक्मय आहे ना? मग आपल्या बाबतीत येणारी कुणाची नाखुषी याने आपण कशाला व्यथित व्हायचे? मुळातच आपला आनंद आपण दुसऱ्याने दिलेल्या सर्टिफिकेटवर का अवलंबून ठेवावा? विचार केला तर लक्षात येईल की अशा किरकोळ गोष्टींवर विचार करून वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या मनाला बऱ्या वाटतील अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो आणि त्याचे समाधानही विलक्षण असते.
कसं? कोणासाठी तरी, अगदी अनोळखी माणसासाठीही, गुपचूप, गाजावाजा न करता काहीतरी करून मदतरूप व्हावं. त्या माणसाला आवश्यक असलेली मदत मिळाल्याने त्याला आनंद होईल. आपल्याला मोठ्ठी देणगी मिळेल ती समाधानाची! एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहिल्याची! गाजावाजा न करत केलेल्या मदतीचे समाधान वेगळे असते.
बाहेरच्या माणसांच्या राग ऊसव्यांचे जाऊ दे. आपल्या नात्यात, घरामधे काहीवेळा खूप वेगळे अनुभव येतात. माणसे फट्कन बोलतात. त्यावेळी राग येऊनही नातीच नकोत असेही वाटू शकते. परंतु जर आपण शांत रहात याकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष केले तर अनेकदा आपोआपच ती माणसे जाग्यावर येतात. ‘असेल त्यांच्याही वागण्याला काही कारण’ असे म्हणत त्रागा न करता आपण ती गोष्ट सोडून दिली तर समोरच्याची चूक त्याच्या लक्षात येऊन पुन्हा सारे ठीक होते. अर्थात यासाठी संयमाची आणि शांतपणे विचार करण्याची तयारी मात्र हवी!
पहा हं..आपल्यातले बरेच जण दुसऱ्याच्या वागण्यातल्या चुका काढण्याबाबत फार ‘दक्ष’ असतात. दुसऱ्याला सुधारायचा मक्ताच जणू यांनी घेतलेला असतो. ‘तू असं का केलंस? असं करायला हवं होतंस’ वगैरे उपदेश सुरू असतात. त्या माणसाला स्वतंत्रपणे बाजूला घेऊन हे सांगितले तर एकवेळ ठीक, परंतु सगळ्यांसमोर सवयीने अशी सुऊवात होत असेल तर ज्याला सांगतोय तो दुखावला जातोच परंतु हे सांगणाऱ्यालाही नंतर अस्वस्थ वाटत राहतं. खरंतर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा खटाटोप सोडून द्यावा. लहानसहान चुकांची चर्चा, चिरफाड करत बसण्याची मुळीच गरज नसते. त्याने वातावरणातील तणाव फक्त वाढतो. दुसऱ्याने काही विचारले तर अवश्य सांगावे परंतु विनाकारण सल्ले देऊन आपणच त्रास ओढवून घेत नाही ना हे तपासून पहायला हवे. आपल्याला आपले प्रŽ, समस्या असतातच. पण काही जणांना ते पुरेसे नसते कदाचित, म्हणून इतरांच्या विचारांची ओझी वाहण्याचा जणू ते विडाच उचलतात. तो असं का बोलला देव जाणे, त्याने असे वागायला नको होते. निमीष असा का वागतो? किती पैसे उडवतो हल्ली. मनालीने असं उत्तर द्यायला नको होतं. अशा पद्धतीच्या कोणाच्या तरी वागण्या बोलण्यावरच्या प्रतिक्रिया आपण अनेकदा ऐकतो. मी सांगणार आहे तिला.. मुळीच सॉरी म्हणू नको, मी सांगणार तिला सरळ नोकरी सोडून दे म्हणून. असे बरेच अनाहूत सल्लेही दिले जातात. सल्ला देणे, मदत करणे वाईट नाही परंतु समोरच्याला त्याची खरंच गरज आहे का? समोरच्याने तुमच्याकडे सल्ला मागितला आहे का हेही तितकेच महत्त्वाचे. नाहीतर मग दुसऱ्यांची यांना कशाला एवढी काळजी असेही लोकांना वाटते.
वेगवेगळ्या नात्यातल्या, ओळखीतल्या लोकांकडून आपण काही काही अपेक्षा ठेवतो. आपल्या अपेक्षेनुसार ती माणसे वागली नाहीत की आपण दुखावले जातो. मी अमुक व्यक्तीचे एवढे केले पण किंमतच नाही तिला.. आमचं नशीबच तसलं असे म्हणत नशिबाला दोष देत सुटतो. आपला मूड जातो. कितीतरी दिवस मनामध्ये ही खदखद तशीच राहते. आपल्यालाच मानसिक तणावाला सामोरे जायला लागते. आता हा त्रास टाळायचा असेल तर काय करायला हवे? अपेक्षेची मोजपट्टी अगदी कमी कमी करत आणायला हवी. थोडं कठीण आहे परंतु अशक्मय नक्कीच नाही. आपण आपल्याला योग्य वाटेल ते करावे, दुसऱ्याला गरजेच्या वेळी मदतही करावी परंतु त्या करण्याच्या बदल्यात अपेक्षा ठेवू नये, म्हणजे पदरी निराशा येत नाही आणि आपले मनही दुखावले जात नाही.
आपल्याला मिळेल तो वेळ छान व्यतीत करावा. हल्लीचे युग हे धवपळीचे युग आहे. फार कामं असतात. जराही वेळ नाही असे आपण सर्वच जण म्हणत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अतिशय कामात असणे हे एकूण यशाचे गमक होऊन बसले आहे म्हणून असेल कदाचित, बोलतानाही आपण सहजतेने वेळ नाही अजिबात असे म्हणतच सुऊवात करतो. गंमत पहा हं, दोन मैत्रिणी ‘कश्शाला म्हणून सवड नाही’ असं म्हणत अर्धा तास फोनवर गप्पा मारतात! पण मुख्य मुद्दा त्या एकमेकींना पटवत असतात तो वेळ नसण्याचा. खरंतर आपण सगळेच कामात असतो. त्यामुळे हे गृहितच धरून टाकावं की सारेच व्यस्त असतात आणि मग जेव्हा गप्पा मारू तेव्हा तो विषय सोडून दुसऱ्या विषयांवर बोलावं! फार काम असण्याचा सतत विचार करणे, वरचेवर त्याचा उल्लेख करणे हेही आपल्याला दमवणारच असते! त्यापेक्षा ज्यावेळी आपली जवळची वाटणारी माणसे भेटतील, फोनवरून संवाद होईल त्यावेळी छान वेगळ्या विषयावर गप्पा माराव्या. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकावं. म्हणजे बघा हं, आपण दिसलो रे दिसलो की गोड हसणारं बाळ, झोपताना गळामिठी घालून झोपणारी आपली लाडकी पिल्लं, ऑफिसात महत्त्वाची काम उरकायला मदत करणारे कलिग्ज, सुनेच्या वाढदिवसाला आवर्जून छोट्टसं तरी गिफ्ट घेऊन येणाऱ्या सासुबाई, एखादा ऊपया सुट्टा नसेल तर राहुद्या हो ताई असं म्हणत छान हसून पुढे निघून जाणारा रिक्षावाला, आठवणीने बायकोसाठी अमुक एक आवडते म्हणून आणणारा नवरा आणि बाजारात गेल्यावर नवऱ्याची आवडती फळं दिसली की ती घेऊन येणारी बायको, कधी आपली एखादी आवडती वस्तू अनपेक्षित रीतीने घेऊन येणारी मैत्रीण.. या आणि यासारख्या कितीतरी गोष्टी आपल्याला सुखावून जातातच ना? मग अशा छान गोष्टींची जाणीव मनात बाळगत मुठी चिमटींनी आपली आनंदाची झोळी भरत राहणे सोपं आहे की नाही? प्रयत्न केला तर नक्कीच सोपं आहे. चला तर मग..अशा छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद जपत आनंदी राहूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे?
-अॅड. सुमेधा संजीव देसाई