नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तुर्कस्थानात दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या भीषण भूकंपात हानीग्रस्त झालेल्या लोकांची सहाय्यता करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ या मोहिमेअंतर्गत तेथे पाठविलेल्या सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. हे दल आपले उत्तरदायित्व पार पाडून दोन दिवसांपूर्वी भारतात परतले आहे. या भूकंपाचा जबर तडाखा तुर्कस्थानच्या शेजारी असणाऱया सिरीयालाही बसला असून दोन्ही देशांमधील मृतांची घोषित संख्या 46 हजारांहून अधिक आहे. प्रत्यक्षात याहीपेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.
या भूकंपग्रस्त देशांना भारताने मोठय़ा प्रमाणात आपत्कालीन सहाय्यता केली होती. अन्नपदार्थ, औषधे, वस्त्रे आणि साधनसामग्री पाठविण्यात आली होती. तसेच भारताच्या आपत्कालीन साहाय्यता दलांचे अनेक सदस्य तेथे बचाव कार्यासाठी पाठविण्यात आलेले होते. जवळपास दीड आठवडा तेथे काम करुन हे सदस्य भारतात परतले आहेत. भारताने तत्परतेने पाठविलेल्या साहाय्यासंबंधीं तुर्कस्थाननेही कृतज्ञता व्यक्त केली होती. भारताच्या साहाय्यता दलाच्या सदस्यांनी अनेक जणांचे प्राण या दोन देशांमध्ये वाचविले. भारतात परतल्यानंतर या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सोमवारी भेट घेतली. आपण केलेले कार्य मानवतेच्या दृष्टीकोनातून महान असून आपण देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भरीव कार्याची प्रशंसा केली.