नुकतेच जन्मलेले नवे बाळ जेव्हा गालातल्या गालात हसले तेव्हा त्याचे नूतन आई-बाबा सुखावले. मात्र जेव्हा ते हुंदके देऊन आतून रडायला लागले तेव्हा ते कासावीस झाले. या चिमुकल्या बाळाला एवढे कोणते दुःख झाले ते त्यांना कळेना. घरातली आजी म्हणाली, बाळाला वयाच्या तीन महिन्यांपर्यंत पूर्वजन्मीचं आठवतं. ती सुखदुःखं आठवून तो हसत-रडत असतो. खरेच का आठवणींनी भरलेला मेंदू घेऊन माणूस जन्माला येतो? हा मेंदू कधी रिता होत नाही का? सभोवती आपण असे बघतो की म्हातारपणी माणसाला भ्रम होतो आणि तो कुणीतरी निराळाच मनुष्य म्हणून सामोरा येतो. एखाद्या स्त्रीला आपले वैवाहिक जीवन मुळी आठवतच नाही. ती आयुष्याच्या उत्तरार्धात मनाने माहेरी नांदत असते. घरातल्या सदस्यांनी कधीही न पाहिलेली माणसे आजूबाजूला घेऊन म्हातारी माणसे जीवन जगत असतात, तेव्हा प्रश्न पडतो की या इवल्याशा मेंदूमध्ये त्या परमात्म्याने असे कोणते रसायन भरले आहे की माणूस रिक्तता अनुभवत नाही?
असे म्हणतात की माणसाच्या मेंदूमध्ये सात कोटी तंतू आहेत आणि एका एका तंतूमध्ये एक कोटी स्मृती साठवण्याची क्षमता आहे. लहानपणी केलेले पाठांतर वृद्धावस्थेत देखील टिकून राहते. कारण तेव्हा मेंदूमध्ये पुरेशी जागा असते. नंतर तो भरून ओसंडू लागतो आणि विसरभोळेपणा जन्माला येतो. मस्तक या गात्राला विशेष महत्त्व आहे. ‘सर्वेशू गात्रेशु शिरः प्रधान’ असे चाणक्मय म्हणतात. मस्तकातली साठवण आयुष्य घडवते किंवा बिघडवते. एकदा संत कबीर प्रवास करीत असताना एका विहिरीवर पाणी पिण्यास गेले. तिथे एक बाई नवऱयाने करून दिलेली सोनाराने घडवलेली नाकातली नथ सर्वांना दाखवत आपली श्रीमंती प्रकट करीत होती. तेव्हा संत कबीर म्हणाले, ‘नथनी दी जिसने उसको सुमरत बार बार, नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार.’ देहाला शाश्वत मानून मीपण डोक्मयात भरले की अहंकार आनंदाची जागा घेऊन त्याला हद्दपार करतो. आनंदाला मस्तकात रिकामपण हवे असते. तरच तो तिथे मुक्तपणे लहरतो. परंतु असे लोक व्यवहारात वेडे ठरतात. संत तुकाराम महाराजांना गाढवाशी खेळणाऱया मुलांनी एकदा गाढवावर बसवले आणि गळय़ात चपलांचा हार घालून रस्ताभर फिरवले. हे दृश्य बघून त्यांची पत्नी आवली रडू लागली, तेव्हा ते म्हणाले, तू का वाईट वाटून घेतेस? त्यांनी तर माझा सन्मान केला. मला गाढवावर बसवून ते स्वतः बिचारे अनवाणी चालत होते. निंदास्तुती, आपलापरका यापलीकडे विश्वरूपाशी एकरूप झालेल्या संत तुकाराम महाराजांनी संकटातून जीवनाचे सोने कसे करायचे हे शिकवले. ‘तुका म्हणे तुझा न पडो विसर’. दुःखाचे डोंगर झाले तरी संसाराचा विसर आणि देवाची आठवण म्हणजेच मस्तकात आनंदाचे रोपण. अंतकाळ साधते किंवा नासवते ती आठवण असते. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा झुला मनात सदैव झोके घेत असतो. आयुष्याच्या संध्याकाळी माणसे शून्यात दृष्टी लावून बसली आहेत असे वाटते. परंतु वास्तव काही वेगळेच असते. गतकाळाच्या आठवणी मनात फेर धरून नाचत असतात. सुटून गेलेला काळ पुन्हा काही पकडीत येत नाही. ती माणसे, तो गाव, तो परिसर, ते खाणे पिणे, काहीही परतून येणारे नाही हे जाणून मन खिन्न होते. त्याच त्या आठवणींची उजळणी मनात सुरू असताना काळ समोर येऊन उभा राहतो आणि अंतकाळी घरादारात, माणसात, पैशात, खाण्यापिण्यात गुंतलेले मन पुढच्या जन्माचे कारण होते.
आठवणी सांगणे हा मनाचा आवडता उद्योग असतो. त्या लिहून ठेवणे सतत दुसऱयांच्या डोक्मयावर ओतणे आणि त्यातच रमून जाणे यात आयुष्य सरते. पूर्वीच्या बायकांजवळ एक जुनी ट्रंक असायची आठवणींची. रत्नमंजुषा म्हणाना! त्यात जुनी रेशमी साडी, बाळलेणी, जुनी नाणी आणि जीर्ण झालेली जिवलगांची पत्रे असत. कधीतरी एकांत मिळाला की ह्या ट्रंकमधल्या वस्तू काढून आठवणींचा पट उलगडून बसायला स्त्रियांना आवडत होते. ती त्यांची स्वतःची कमाई होती म्हणून असेल कदाचित, आठवणींचा कशिदा उसवून पुन्हा विणून जसाच्या तसा जपून ठेवण्यात त्यांना आनंद होता. जगण्याचे अमूल्य क्षण आनंद न घेताच वळवावरच्या पाण्यासारखे सहज निसटून गेले की आठवणींची साठवण होऊन रांजण भरत राहतात. आठवणींचा पिंगा परमेश्वराकडे जाण्याची वाट गुंता करून अडवून ठेवतो एवढे मात्र खरे. ज्याचा नित्य वियोग आहे असा संसार श्रीकृष्णांच्या गोपींनी सोडून दिला. त्याची पुसटशी आठवणही त्यांच्या मनात राहत नसे. ‘यापरी बुद्धिमत्ता मदाकार, म्हणुनी विसरल्या घरदार, विसरल्या पुत्रभ्रतार, निजव्यापारासही विसरल्या’ असे भागवतामध्ये म्हटले आहे.
संत मीराबाई या राजघराण्यात रजपूत कुळात जन्माला आल्या. लहानपणापासून त्या कृष्णवेडय़ा होत्या. त्यांच्या घरी भागवत सांगायला पुराणिक बुवा येत. लहानगी मीरा भागवताचे मनःपूर्वक श्रवण करायची. कथा ऐकताना मध्येच पुराणिक बुवांना थांबवून ती म्हणायची, कथेमधला एक प्रसंग तुम्ही गाळला, तो सांगा. मीरा स्वतः त्या प्रसंगाचे वर्णन करायची. पोथी संपूर्ण चाळून-वाचून तो प्रसंग काही सापडायचा नाही. बुवा म्हणायचे, असं काहीही घडलेलं नाही. मीरा म्हणायची, असं घडलेलं आहे हे नक्की. कारण मीरा ही श्रीकृष्णाच्या काळात ललिता नावाची गोपी होती. श्रीकृष्णाच्या आठवणीत मीरा दंग झाली. संत तुलसीदासांना मीराबाईंनी पत्र लिहून कळवले होते की, माझा पती फक्त श्रीकृष्ण आहे. आप्त मला विनाकारण त्रास देत आहेत तर मी काय करू? तेव्हा चित्रकूटहून संत तुलसीदासांचे तिला उत्तर आले की, कसोटी नेहमी सोन्याची होते. ज्याला राधाकृष्ण प्रिय नाहीत तो सख्खा भाऊ जरी असला तरी त्याचा त्याग करणेच इष्ट. तेव्हा तिने मेवाड सोडले व ती वृंदावनात आली. संत मीराबाई एका पदामध्ये असे म्हणतात, ‘म्हारो जनम मरन को साथी थाने । नही बिसरू दिन राती ।।’ ओशो रजनीश याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात, मीराने ते साथीदार सोडून दिले, जे जन्मानंतर बनले होते. तेही साथीदार सोडून दिले, जे मृत्यूनंतर साथ सोडून देणार होते.
माणसाला परमेश्वराचे स्मरण कसे करावे हा प्रश्न पडतो आणि मीरेला वाटते, मी ईश्वराचे विस्मरण कसे करू? माझी इच्छा झाली तरी मी तुला विसरू शकत नाही. अंतर्यामी खोल वसलेल्या त्या परमात्म्याची आठवण तेव्हढी ठेवावी आणि भौतिक जगातल्या शून्यवत रंगीत नात्यांना विसरून जावे हेच परमार्थाचे खरे लक्षण आहे.
– स्नेहा शिनखेडे