काँग्रेसमध्ये पक्षांतर केलेल्यांची दखल घेणार असल्याचे स्पष्टीकरण
बेळगाव : काँग्रेसला मिळालेला विजय हा काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमुळे याचबरोबर इतर पक्षांतून आलेल्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांमुळेच झाला आहे. या सर्वांच्या एकजुटीमुळे बळकटी मिळाली आहे, असे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव येथील सर्किट हाऊस येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. भाजपमधून आलेले लक्ष्मण सवदी यांची भेट घेण्यासाठी ते आले होते. काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या काही नेत्यांचा पराभव झाला तरी त्यांचे योगदान पक्षासाठी मोठे आहे. भविष्यात त्यांना योग्य ती पदे दिली जातील. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसमध्ये आता कुणाचीही नाराजी राहणार नाही. काहीजणांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी काँग्रेस पक्ष निश्चितच सहकार्य करेल. भाजप-जेडीएसमधून जे नेते काँग्रेसमध्ये आले आहेत, त्यांचे योगदान हे कधीच विसरणार नाही, असे सांगत मंत्रीमंडळाची निवड झाली असली तरी उर्वरित नेत्यांना योग्य स्थान दिले जाईल, असे सांगितले. सवदी यांच्या भेटीनंतर हुबळी येथे जगदीश शेट्टर यांचीदेखील भेट घेतली. सर्किट हाऊसमध्ये त्यांच्याबरोबर मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार राजू सेठ, आमदार विश्वास वैद्य, आमदार महेंद्र तम्मण्णावर आणि विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे उपस्थित होते.