आमदार दिगंबर कामत यांचे उत्तर
मडगाव: काँग्रेसमधून भाजपमध्ये घरवापसी केलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपच्या गोटात परतण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपण देवाचा सल्ला घेतल्याचे सांगितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांना भाजपमध्ये येऊन आता आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला असून, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांचा नेमका कधी समावेश होणार आहे, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता ‘हे देवाला विचारा’, असे उत्तर त्यांनी दिले. यावेळी कामत यांनी आकाशाकडे पाहून अंगुलीनिर्देश केल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. मडगाव पालिकेच्या नूतनीकरण केलेल्या चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन केल्यानंतर ते बागेतून बाहेर पडत असताना एका पत्रकाराने कामत यांना मंत्रिमंडळात कधी सामील होणार, असा प्रश्न केला. कामत यांनी बोट वर करून आकाशाकडे पाहिले आणि ’त्याला विचारा आणि तो सांगेल’ अशी टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचे जवळचे सहकारी, समर्थक आणि पत्रकारांना हसू आवरेना झाले. जवळपास वर्षभरापूर्वी कामत, आमदार आलेक्स सिक्वेरा आणि इतर कॉंग्रेस आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सोडला होता. आठ सदस्यीय काँग्रेस गट सत्ताधारी पक्षात सामील झाला तेव्हा कामत आणि आलेक्स या दोघांनाही सावंत सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. तेव्हापासून, या दोघांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता सतत वर्तवली जात आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाची शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे कामत यांना मंत्रिमंडळात स्थान कधी मिळेल यासंदर्भात वरचेवर चर्चा होताना दिसून येत आहे.