इस्रोची घोषणा: पुढील यशासाठी सज्ज; चंद्रावरचा प्रवास यशस्वी करण्याचा निर्धार
► वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
चांद्रयान-3 या वषी जुलैमध्ये प्रक्षेपित केले जाणार असल्याची मोठी घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सोमवारी केली. अंतराळ क्षेत्रात भारताचे हे आणखी एक मोठे यश असेल, असे ते म्हणाले. ओडिशातील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलद्वारे (जीएसएलव्ही) नेव्हिगेशन उपग्रह एनव्हीएस-01 यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी यासंबंधी अधिकृत माहिती दिली.
‘चांद्रयान-3’चे प्रक्षेपण ‘चांद्रयान-2’च्या लँडर-रोव्हरच्या अपघातानंतर चार वर्षांनी जाहीर करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहीम जुलैमध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सूर्याच्या वैश्विक किरणांपासून संरक्षित असलेल्या चंद्राच्या अंधाऱ्या बाजूला प्रक्षेपित होण्याची अपेक्षा आहे. कारण हा भाग पृथ्वीच्या समोर येत नाही. पेलोड आता यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये एकत्रित केले जात आहेत. इस्रोची टीम जुलैच्या मध्यात भारतातील सर्वात वजनदार रॉकेट, ‘लॉन्च व्हेईकल मार्क-3’ला प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्र्रम घेत आहे. मिशनची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची पुष्टी इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे.
चांद्रयान-2 मोहीम 2019 मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर या तीन वेगवेगळ्या यंत्रणांचे हे मिशन अद्वितीय संयोजन होते. ऑर्बिटरने निर्दोषपणे काम करत स्वत:ला चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापित केले. मात्र, लँडर आणि रोव्हर युनिट चंद्राच्या दूरच्या बाजूला क्रॅश झाल्याने ते गमवावे लागले. भारतीय अंतराळ संस्था तिच्या किफायतशीर दृष्टिकोनासाठी ओळखली जाते. आता चांद्रयान-3 समवेत फक्त एक लँडर आणि एक रोव्हर प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उद्देश नवीन चंद्र मोहिमेसाठी चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा पुनर्वापर करण्याचा आहे.
अपयशातून बरेच शिकलो : एस. सोमनाथ
कोणतेही नवीन काम केले की यश आणि अपयश येते, असे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अपयश येणे सामान्य असून प्रत्येक वेळी आपण यशस्वी व्हावेच असे नाही, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातून शिकून पुढे जाणे ही आहे. जेव्हा जेव्हा काही सूचना दिल्या जातात तेव्हा आम्ही त्या पाळण्याचा प्रयत्न करतो. मागील अपयशातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकल्या असून आता ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी सज्ज झालो आहोत, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.