पुणे / प्रतिनिधी :
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने टिळक घराण्याला डावलून पुणे मनपाच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता मनसेही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे निवडणुकीत उतरणार का आणि उतरल्यास त्यांचा उमेदवार कोण असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होत आहे. भाजपाकडून येथून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, टिळक घराण्याला डावलून भाजपाने हेमंत रासने यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ टाकली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून आता निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते.
अधिक वाचा : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत ‘आप’ची एन्ट्री
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले आणि पोटनिवडणुकीत त्याच कुटुंबातील सदस्य असेल, तर निवडणूक लढवायची नाही, अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. मात्र, भाजपाने कुटुंबाबाहेरील उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन मनसे कसब्याची निवडणूक लढवेल, असे मानले जात आहे. मनसेकडून कसबा विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या संकल्प मेळाव्यात मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, पक्षाचे नेते अनिल शिदोरे, गणेश सातपुते तसेच सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यावेळी बोलताना आमची लढण्याची इच्छा आहे आणि आपण लढले पाहिजे, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली होती.