अमेरिकेत भारतीयांना केले संबोधित : वक्तव्यांमुळे पुन्हा वाद : भाजपकडून जोरदार टीकास्त्र
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधींनी मंगळवारी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांना संबोधित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देवालाही जग कसे चालवावे हे शिकवतील, यामुळे आपण काय निर्मिलो हे पाहून देवही चक्रावून जातील अशी उपरोधिक टीका राहुल गांधी यांनी स्वत:च्या संबोधनादरम्यान केली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल यांनी विदेशात भारतीय पंतप्रधानाचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
राहुल हे मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेत पोहोचले, परंतु इमिग्रेशन क्लियरेन्ससाठी विमानतळावर त्यांना 2 तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. यावर तुम्ही रांगेत का उभे आहात असे विचारण्यात आले असता आता मी सर्वसामान्य व्यक्ती असून खासदार नाही, असे उत्तर राहुल यांनी दिले.
कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पदयात्रा सुरू केली होती. यादरम्यान राजकारणात कुठल्या गोष्टींचा वापर होतो हे जाणवायला लागले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान देशात काय घडतंय याची जाणीव मला झाली. मी एकटा चालत नव्हतो, तर भारत माझ्यासोबत चालत होता. प्रेमाच्या वातावरणामुळे कुणालाच थकवा जाणवत नव्हता. सर्वजण परस्परांना मदत करत होते. अशा स्थितीतच ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान’ सुरू करण्याची कल्पना सुचल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
सर्वज्ञ असल्याचा भ्रम
जग अत्यंत विशाल असल्याने आपण सर्वकाही जाणतो असे कुणीच म्हणू शकत नाही. काही जणांचा गट आपल्याला सर्वकाही माहित असल्याचे मानतो. आपल्याला देवापेक्षाही अधिक माहित असे त्यांना वाटते. आमचे पंतप्रधान अशाच लोकांपैकी एक आहेत. मोदींना देवाच्या शेजारी बसविल्यास ते जग कशाप्रकारे चालवावे हे देवालाही सांगू लागतील असे मला वाटते असे उद्गार राहुल यांनी काढले आहेत. भारतात काही लोक जणू सर्वज्ञच आहेत, ते वैज्ञानिकांना विज्ञान शिकवू शकतात. इतिहासकारांना इतिहास शिकवू शकतात, सैन्याला युद्ध लढणे आणि वायुदलाला उ•ाण शिकवू शकतात. परंतु जोपर्यंत तुम्ही ऐकून घेण्याची सवय लावून घेत नाही तोवर काहीच शिकू शकत नसल्याचे म्हणत राहुल यांनी एकप्रकारे भाजप नेत्यांना लक्ष्य केले आहे.
ईडी-सीबीआयचा गैरवापर
भाजप सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकाविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागतो. प्रसारमाध्यमांमध्ये भारताचे खरे चित्र दाखविण्यात येत नाही. वास्तविकतेपासून दूर असलेल्या राजकीय विचारसरणीला काही प्रसारमाध्यमे बळ देऊ पाहत आहेत. ही एक मोठी विकृती असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
सत्तेवर येताच महिला आरक्षण
महिला आरक्षणासंबंधी राहुल गांधी यांना या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राहुल यांनी केंद्रात सत्तेवर येताच महिला आरक्षण विधेयक संमत करवू असे उत्तर दिले आहे. पूर्वी काही पक्ष आमच्यासोबत नव्हते, परंतु आता ही स्थिती नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
मुस्लिमांसोबत भेदभाव
मुस्लीम समुदाय अन् सर्व अल्पसंख्याकांसोबत आता भारतात भेदभाव होत आहे. काही लोकांकडे संपत्ती एकवटली असून अल्पसंख्याक दारिद्र्यात लोटला जात आहे. परंतु तुम्ही द्वेषावर द्वेषाने विजय मिळवू शकत नाही. भारतीय लोक द्वेषावर विश्वास ठेवत नाहीत. काही लोकांनी व्यवस्था अन् प्रसारमाध्यमांवर कब्जा केला असून त्यांच्याकडून विघातक मानसिकता फैलावली जात आहे. आम्ही भेदभावावर प्रेमाच्या सहाय्याने विजय मिळवू असे वक्तव्य राहुल यांनी केले आहे.
खलिस्तान समर्थनार्थ घोषणा
राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमात खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी केली तसेच खलिस्तानी झेंडे फडकविले आहेत. दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने एक व्हिडिओ जारी करत राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना धमकी दिली आहे.
भाजपकडून शाब्दिक हल्लाबोल
राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील भाषणावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी हे विदेशात भारताचा अपमान करण्याची एकही संधी दवडत नाहीत. प्रत्येक विदेश दौऱ्यात ते स्वत:च्या चुकांची पुनरावृत्ती करत असल्याची टीका भाजपने केली आहे. जगभरातील नेते पंतप्रधान मोदींचे कौतुक करत असताना देशातील एका नेता विदेशी भूमीवर मोदींना अपमानित करतोय. अशा नेत्यावर प्रत्येक भारतीयाने बहिष्कार टाकावा असे हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या प्रत्येक विदेश दौऱ्यात भारताचा अपमान करण्यात येतो. राहुल गांधी हे मूळात भारताला राष्ट्रच मानत नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. राहुल हे गांधी नव्हे तर ‘फेक गांधी’ आहेत. ज्या व्यक्तीचा स्वत:चा इतिहास स्वत:च्या कुटुंबापेक्षा पुढे जात नाही, तो इतिहासाबद्दल बोलतोय हीच गोष्ट मूळात हास्यास्पद असल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे.