केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे प्रतिपादन
पणजी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी भारतीय जनतेचाच नव्हे तर जगभरातही विश्वास संपादन केला आहे, असे केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. भारतात जे गेल्या कित्येक वर्षापासून झाले नव्हते, ते गेल्या नऊ वर्षात झाले आहे. आज भारत देश जगाचा विश्वास संपादन करीत आहे, असेही डॉ. कराड यांनी सांगितले. 2014 साला पूर्वी देशात केवळ अविश्वास वाढला होता. आज मात्र परिस्थिती उलट आहे. जगभरात भारताने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे, असेही कराड म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामाचा आढवा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दामू नाईक, दयानंद सोपटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. सबका साथ सबका विकास हे भाजपचे धोरण असून मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांबरोबरच सर्व घटकांतील लोकांसाठी काम केले आहे, म्हणूनच आज ते जनमानसात सुपरिचित आहेत. सेवा, सुशासन, गरीब कल्याण हाच भाजपचा उद्देश आहे. आज देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे देश आज आयातीपेक्षा निर्यातीवर भर देत आहे. कोविड काळात जगातील 60 देशांना कोविड लस निर्यात केली आहे. देशात बुध्दीमत्ता आहे, ताकद आहे त्याला चालना देण्याची आवश्यकता होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी देत असल्याने देश विकासाच्या दिशेने जात आहे. आज देशात शेती, आरोग्याबरोबर इतर सर्व क्षेत्रात झपाट्याने विकास होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही होत आहे, असेही कराड म्हणाले.