देशातील राजकारण एका निराळय़ा वळणावर आहे. ढवळून टाकले जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरुद्ध आता बडतर्फ केलेल्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर दर शुक्रवारी जोरदार विरोध प्रदर्शने सुरु झाली आहेत. सैन्यदलात भरतीकरता सुरु करण्यात येत असलेल्या ‘अग्निपथ’ योजनेने उत्तरेतील युवक पेटून उठला आहे, पेटवत सुटला आहे.
तिसरीकडे एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (ईडी) अर्थात सक्तवसुली संचालनालय राहुल गांधींच्या लांबलचक उलटतपासणीला लागली आहे. पंतप्रधानांच्या सौजन्याने राहुलना दररोज हेडलाइन मिळत आहे. गेल्या आठ वर्षात काँग्रेसी नेता आणि कार्यकर्ता प्रथमच रस्त्यावर उतरला आहे. कोणाला आवडो अथवा नावडो, राहुल हेच काँग्रेसचे खरे नेते आहेत हा संदेश सर्वदूर गेलेला आहे. गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या जी-23 गटातील काँग्रेसमधील असंतुष्ट नेतेमंडळींना पक्ष अक्षरशः विसरला आहे. विरोधी पक्षांमधील बऱयाच नेत्यांवर ईडीने केसेस टाकल्या असल्या तरी त्यांचे पक्ष फारसे उसळून उठले नाहीत. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी ईडीच्या नोटिसीचा मुद्दा करून निवडणूक भाजपवर उलटवली. अशी घटना एखादीच. आता राहुलच्या उलट तपासणीच्या वेळी काँग्रेसने दाखवलेली एकता म्हणजे मरणासन्न झालेल्या पक्षाला जणू संजीवनीच आहे. जर कार्यकर्ता पेटून उठला तर तो पक्ष अचानक जिवंत होतो. सोनिया गांधी रुग्णशय्येवर असताना राहुलवर होत असलेला हा हल्ला पक्षकार्यकर्त्याला हालवून सोडत आहे.
एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (ईडी) अर्थात सक्तवसुली संचालनालय म्हणजे विरोधी नेत्यांना वठणीवर आणण्याचा मोदी सरकारचा आसूड आहे की भाजपचे चांगभले करण्यासाठी त्याच्या विरोधकांना नेस्तनाबूत करणारे अस्त्र आहे याविषयी उलटसुलट चर्चा देशभर ऐकायला मिळत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सक्रिय असलेल्या ईडीला सगळीकडे मोदीविरोधकच आपले भक्ष म्हणून सापडत आहेत. नावालाही एकही भाजपाई त्याच्या तावडीत सापडत नाही याचा अर्थ काय घ्यावा? सत्ताधारी पक्षात सारे सद्गुणांचे पुतळे आणि विरोधी पक्ष म्हणजे राक्षसांची बजबजपुरी आहे का? ‘आमच्या हातात दोन दिवस ईडी द्या, मग आम्ही भाजप नेत्यांचे कसे बारा वाजवतो ते बघा’, असा सूर विरोधी गटात लागत आहे. त्यामुळे काळेबेरे असण्याच्या संशयाला वाव आहे.
नॅशनल हेराल्ड मामल्यात कितपत दम आहे? असंतुष्ट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या अनुसार राहुल आणि सोनिया गांधी यांनी ईडी पुढे सत्यकथन केले किंवा असत्यकथन केले तरी त्यांचे तुरुंगात जाणे अगदी पक्के आहे, त्यांना कोणीच वाचवू शकत नाही. स्वामी यांच्या तक्रारीवरूनच ईडीने ही मोहीम आरंभीली आहे. भाजप नेते देखील अशाच प्रकारे काँग्रेसवर आक्रमक आहेत. ‘चोर ते चोर आणि वर शिरजोर’ अशा पद्धतीने ते काँग्रेसवर हल्ला बोल करत आहेत.
देशातील नामवंत वकील समजले जाणारे काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यानुसार मात्र हे सारे प्रकरण म्हणजे ‘डोंगर पोखरून उंदीर’ काढण्याचा प्रकार आहे. कारण एका पैशाची देवाणघेवाणच झालेली नसताना गांधी घराण्याने पैशाचा अपहार केला हे म्हणणे धादांत मूर्खपणा आहे. दुसरे प्रख्यात वकील अभिषेक सिंघवीदेखील अशाच मताचे आहेत. दिवसाला करोडो रुपये मिळवणारे हे वकील पक्षप्रेमाकरता अक्कल गहाण टाकणाऱयांपैकी नाहीत. राहुल आणि सोनिया यांनी किती जबर गुन्हा केला आहे त्याचे मीठमिरची लावलेले वर्णन काही सरकारधार्जिण्या वृत्तवाहिन्यांवर दाखवले जात आहे. ते खरे मानले तर अपराध घडलेला आहे, असे मोदी समर्थक दावा करत आहेत. पण सरकार अथवा तिच्या अखत्यारीतील संघटना अधिकृतपणे प्रसारमाध्यमांना काहीच सांगत नसल्याने त्यात बरोबर किती आणि चूक किती ते एक देवालाच ठाऊक.
काँग्रेसने गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विधिमंत्री किरण रिजुजु यांना कायदेशीर नोटीस पाठवून ईडी राहुल यांच्याविरुद्ध खोटानाटा प्रचार आपल्या राजकीय मास्टरना खूष करण्यासाठी करत आहे, असा आरोप केला आहे. त्याला सरकारचे अजूनही उत्तर आलेले नाही. ईडी समोरच्या प्रकरणामध्ये अशा प्रकारचा प्रचार झाला तर तो घटनेविरुद्ध आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे, याचीही सरकारला जाणीव करून दिली गेली आहे.
राहुल प्रकरणात काँग्रेस उगीचच भोकाड पसरत आहे असा आरोप भाजप करत आहे. तर असे असेल तर राहुल यांच्या ईडी समोरील उलटतपासणीची लिंक ही अधिकृतपणे प्रसारमाध्यमांना देण्यात यावी आणि लोकांना आपलेआपण या आरोपात किती तथ्य आहे ते बघून द्यावे अशी मागणी काँग्रेस नेते आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीरपणे केलेली आहे. राहुल ईडीसमोर काय उत्तरे देत आहेत ते प्रत्यक्ष लोकांना कळू द्या असे सांगून बघेल हे भाजपाचा प्रचार पंक्चर करत आहेत.
उत्तर प्रदेश जिंकल्यावर 2024 ला नवी दिल्ली परत काबीज करण्यासाठी मोदी रणनीती आखत आहेत त्याचाच एक भाग म्हणून हे प्रकरण परत उकरून काढले गेलेले आहे, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ही शंका कितपत खरी अथवा खोटी हे येणारा काळ दाखवेल पण एक मात्र खरे अनवधानानं का होईना पंतप्रधानांनी कुंभकर्णासारख्या निद्रिस्त काँग्रेसला जागे केले आहे. गुजरातमधून येणाऱया माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधींना अटक केली होती. आता त्याची पुनरावृत्ती मोदी राहुल आणि नंतर सोनियांना अटक करून करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
जून महिना गांधी घराण्याकरता तसेच काँग्रेसकरता वादळाचा राहिलेला आहे. जवळजवळ 45-50 वर्षांपूर्वी याच महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबातल केली होती. त्यानंतर त्याच महिन्यात देशावर आणीबाणी लादण्यात आली होती. संजय गांधी यांचा अपघाती मृत्यूदेखील जूनमधीलच. ऑपेरेशन ब्लू स्टारदेखील जूनमध्येच सुरु करण्यात आले होते. शहा कमिशनचे शुक्लकाष्ट इंदिरा गांधींच्या मागे मोरारजी आणि चरण सिंग यांनी लावले होते. मोदी-शहा यांनी राहुल आणि सोनियाना ईडीपुढे उभे केले आहे. राहुल-सोनियांमध्ये देखील इंदिरेची सर नाही. मोदी मीडियाने ‘पप्पू’ अशी कितीही संभावना केली असली तरी राहुल हे आपली छबी मोदी सरकारचे प्रमुख विरोधक अशी बनवण्यात यशस्वी झाले आहेत हेही तेव्हढेच खरे.
सुनील गाताडे