प्रतिष्ठेच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी उमटविलेली मोहोर म्हणजे चित्रविश्वात आशयाच्या पातळीवर मराठीचे वजन वाढल्याचाच परिपाक म्हणता येईल. यंदा शंतनू रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला असून, सर्वोत्तम सामाजिक चित्रपटाकरिता ‘फनरल’ या चित्रपटाची निवड झाली आहे. याशिवाय प्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्यासह अनेक कलावंत व बालकलाकारांचाही या मानाच्या पुरस्काराने सन्मान झाला असून, तो यथोचितच म्हणायला हवा. साडी हा महिलांच्या जिव्हाळय़ाचा विषय मानला जातो. त्यात पैठणीबद्दल प्रत्येक स्त्रीच्या मनात एक हळवा कोपरा असतो. अशीच पैठणी घेण्याची एका पत्नीची इच्छा ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून अत्यंत तरलतेने दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री सायली संजीव हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून तिने आपली अभिनयक्षमताच सिद्ध केली असून, भविष्यात नक्कीच तिच्याकडून अपेक्षा असतील. प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम हे मराठी सिनेसृष्टीतील एक जातीवंत कलाकार मानले जातात. सौमित्र या नावाने ते काव्यलेखनही करीत असतात. नटरंग, जोगवा, फँड्री, एक कप च्या, टुरिंग टॉकीज, दिठी अशा अनेक आशयघन चित्रपटांमध्ये आपल्या अभिजात अभिनयाची छाप त्यांनी सोडली आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराचा ‘गोदाकाठ’ व ‘अवांछित’ या चित्रपटासाठी ‘विशेष ज्युरी पुरस्कारा’ने सन्मान होणे, हे म्हणूनच महत्त्वपूर्ण होय. भूमिका कितीही छोटी असो वा मोठी. ती भूमिका सजीव करण्याची हातोटी अत्यंत कमी कलावंतांकडे असते. किशोर कदम हे त्यापैकी एक होत. ‘अवांछित’मध्ये त्यांनी साकारलेली बापाची भूमिका अशीच हृदयस्पर्शी. या चित्रपटात वडील व मुलगा यांच्यातील नाते हळूवारपणे उलगडण्यात आले आहे. काळजाचा ठाव घेणारा हा चित्रपट कदम यांच्या अभिनयामुळे संस्मरणीय ठरतो. गजेंद्र अहिरे यांचा ‘गोदाकाठ’ हा एक वेगळय़ा धाटणीचा सिनेमा आहे. मानवी जीवन हे अनंत अडचणींनी भरलेले आहे. जीवनाच्या प्रवाहात या संकटांच्या लाटा अव्याहतपणे आदळतच असतात. मात्र, या साऱयाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, हेही महत्त्वाचे असते. आपल्या गरजा नक्की काय आहेत, हे समजले, की मानवी आयुष्य सुखकर होऊन जाते. हा समाधानी भाव व सकारात्मक दृष्टीकोन देणारा चित्रपट म्हणून याकडे पहावे लागेल. यात किशोर कदम यांनी रंगवलेला सदानंद हा मनाचा ठाव घेतो. साध्यासुध्या घरात कमीत कमी गरजांसह राहणाऱया प्राण्यांच्या डॉक्टरची भूमिका किशोर कदम यांनी अतिशय संवेदनशीलतेने साकारली आहे. त्यांचे प्रत्येक वाक्य न वाक्य काळजाला स्पर्शून जाते. खरे तर संवादफेक हे कदम यांच्या अभिनयाचे वैशिष्टय़ आहे. त्यांच्या संवादफेकीतील चढउतारांना तोड नाही. चेहऱयावर उमटणारे नेमके भावही असेच. स्वाभाविकच त्यांच्यासारख्या कलाकाराचा गौरव झाला, याचा मनस्वी आनंद वाटतो. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनाही ‘मी वसंतराव देशपांडे’ या चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर याच चित्रपटासाठी ध्वनी संयोजक अमोल भावे यांना फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम ध्वनी संयोजनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे हे अभिजात गायक आहेत. अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांनी हा चित्रपट साकारला असून, आपल्या आजोबांची भूमिका जिवंत केली आहे. आपण आजोबांची शैली घेतली, त्यांच्यासारखा गायलो नाही, असे स्वतः राहुल देशपांडे म्हणतात. त्यांच्या यशाचे इंगित यातच आहे, असे म्हणावे लागेल. शास्त्रीय संगीतात वसंतराव देशपांडे यांचे अतुलनीय योगदान आहे. किंबहुना, या महान कलावंताची तशी उपेक्षाच झाली. त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. हा संघर्ष त्यांच्या नातवाने अतिशय परिणामकारकपणे मांडला आहे. म्हणूनच ‘मी वसंतराव’ हा चित्रपट वेगळा ठरतो. ‘जून’ या चित्रपटाकरिता सिद्धार्थ मेनन याला विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. पश्चात्तापदग्ध झालेल्या दोन व्यक्ती अपघाताने एकमेकांसमोर येतात आणि मनात रुतून बसलेल्या काटय़ाची जखम पुन्हा भळभळू लागते, या जखमेची कहाणी म्हणजेच ‘जून’ हा चित्रपट होय. यात सिद्धार्थने केलेला अभिनय हा विलक्षण ताकदीचा म्हणावा लागेल. त्याच्या अभिनयातील सूक्ष्मपणा, संयतपणा प्रेक्षकांना भावल्याशिवाय राहत नाही. विवेक दुबे यांचा ‘फनरल’ हा उत्तम चित्रपट आहे. जीवनाची सुरुवात आनंदात होत असेल, तर शेवट का आनंदाने होऊ शकत नाही, असा विचार हा सिनेमा देतो. अंत्यसंस्काराला आजकाल माणसेही कशी मिळत नाहीत, यावर प्रकाश टाकतानाच मृत्यबद्दलच्या शुभअशुभालाही ही कलाकृती छेद देते. सोबत निसर्ग संवर्धन, अवयवदानाचाही संदेश देऊन जाते. म्हणूनच हा खऱया अर्थाने सामाजिक चित्रपट ठरतो. अमोल गोळे यांच्या ‘सुमी’ला सर्वोत्तम मराठी बालचित्रपटाचा मान मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलीची शिक्षणासाठीची धडपड आणि तिने साध्य केलेले यश, अशी या चित्रपटाची कथा आहे. यातील पिंपरी-चिंचवडच्या आकांक्षा पिंगळे हिची सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून निवड झाली आहे. त्याचबरोबर दिव्येश इंदुलकर व अनिश गोसावी (टक टक) हेही याच पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. ओम राऊत यांचा ‘तानाजी’, आशुतोष गोवारीकर यांचा ‘तुलसीदास ज्युनिअर’, सर्वौत्कृष्ट कौटुंबिक मूल्यांवर आधारित ‘कुंकुमार्चन’ अशाही चित्रपटांनी पुरस्कारात आपली नाममुद्रा उमटविली आहे. मागच्या काही वर्षांत मराठी चित्रपटांनी वेगळे वळण घेतले आहे. अनेक आशयसमृद्ध चित्रपट येत आहेत. त्यामुळे देशातील चित्रपट रसिकांचे मराठी चित्रपटांबद्दलचे कुतहल वाढत चालले आहे. एकेकाळी हिंदी चित्रपटांचे अनुकरण करण्यावर मराठीत भर असे. आज उलट चित्र पहायला मिळते. मराठी कलावंतही आता नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करीत आहेत. हे सारे सुखावह होय. मराठीचे पाऊल असेच पुढे पडत रहावे. आगामी काळातही दर्जेदार चित्रपट यावेत व रसिकांनाही उच्चकोटीचा आनंद घेता यावा, हीच अपेक्षा.
Previous Articleतेलंगणामध्ये 1.20 कोटी ध्वजांचे होणार वाटप
Next Article एकविसावे शतक भारताचेच !
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.