ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत असलेला मान्सून यंदा सहा दिवस आगोदरच अंदमानात दाखल झाला आहे. 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (monsoon-arrived-in-andaman-today)
पुणे वेधशाळेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून अंदमानात 22 मे रोजी दाखल होणार होता. मात्र, यंदा हा मान्सून सहा दिवस आधीच दाखल झाला. 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र केरळमध्ये सुध्दा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. यंदा केरळमध्ये मान्सून 27 मे रोजी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी येईल हे अद्याप सांगता येणार नाही. मात्र देश पातळीवर एकूण मान्सूनचा विचार केल्यास सरासरीच्या 99 टक्के पाऊस असेल.
दरम्यान, सध्या अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.