मशागतीच्या कामाला वेग, शेतकऱ्यांची धडपड, बी-बियाणे खतांच्या मागणीत वाढ, मोठ्या पावसाची प्रतिक्षा
प्रतिनिधी / बेळगाव
मान्सून तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वेळेत पेरणी हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस झाला नाही. मात्र बळीराजा पेरणीपूर्व मशागतीची कामे करू लागला आहे. दरम्यान शिवारात शेतकऱ्यांची वर्दळ वाढली असून, मान्सून तोंडावर अन् शेतकरी बांधावर असे चित्र पहावयास मिळत आहे. पेरणी हंगाम जवळ आल्याने बी बियाणे, खते आणि कीटकनाशकांची मागणी वाढू लागली आहे. त्याबरोबर पेरणी पूर्व मशागतीची कामे देखील जोमाने सुरू झाली आहेत. टॅक्टर आणि बैलजोडीच्या सहाय्याने नांगरट, पलटी आणि सरी काढण्याचे कामदेखील केले जात आहे. खरीप हंगामात भात, जोंधळ, ऊस, मका, भुईमूग, बटाटा, रताळी, सोयाबीन आदी पिकांची पेरणी व लागवड केली जाते. त्यामुळे बियाणांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.
वळीवाचा पाऊस काही भागात कमी जास्त प्रमाणात झाला आहे. त्या ठिकाणी मशागतीच्या कामांना वेग येऊ लागला आहे. तर काही ठिकाणी धूळवाफ पेरणीला पोषक वातावरण असल्याने पेरणीचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. मात्र पावसाअभावी शेतीकामे रखडल्याचे चित्रही पहावयास मिळते आहे. मशागत वेळेवर होत नसल्याने पेरणी लांबणीवर पडण्याची चिंतादेखील व्यक्त होऊ लागली आहे. मान्सून जवळ आल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरट, खत टाकणे आणि इतर कामेदेखील सुरू झाली आहेत. मात्र काही भागात रोजगार हमीची कामे देखील सुरू आहेत. त्यामुळे शेती कामात मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे काही कुटुंबे एकत्रित येत शेती कामे करत असल्याचे दिसत आहेत. पावसाअभावी मशागतीची कामे लांबणीवर पडली होती. मात्र आता किरकोळ प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कामे हाती घेतली आहेत. मात्र जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होण्यासाठी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा आहेत.
सुधारित बी बियाणे कृषी खात्याकडून दिली जात आहे. रयत संपर्क केंद्र आणि कृषी पतीन संघामध्ये बियाणे उपलब्ध करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सवलतीच्या दरात बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन खात्याने केले आहे. अलीकडच्या काही वर्षात सुधारित आणि संकरित बियणीच्या मागणीत वाढ झाली आहे. पारंपरिक दोडगा, बासमती भाताबरोबर मणिला, शुभम, सोनम, इंद्रायणी जातींच्या भात बियाणाला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे कृषी केंद्रावरदेखील शेतकऱ्याची वर्दळ वाढत आहे.
तालुक्यातील उचगाव, हिंडलगा, कुद्रेमनी, बाची, तुरमुरी, सुळगे, बेळवट्टी, बेळगुंदी, शिनोळी, राकसकोप, यळेबैल, बिजगर्णी, कावळेवाडी, बाकनूर, बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड, बेकिनकेरे, गोजगा, अतिवाड, मण्णूर, आंबेवाडी, कल्लेहोळ, मंडोळी, सावगाव, बेनकनहळ्ळी, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, मण्णीकेरी, केदनूर, कडोली, हालगा, हंदिगनूर, काकती, देवगिरी, बंबरगे, अलतगा, आदी परिसरात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. काही भागात किरकोळ पाऊस झाला तर काही भागात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे मशागतीच्या कामातदेखील अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसत आहे.