परकीय आक्रमकांच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकारचे महत्वाचे पाऊल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात असणाऱया ‘मुघल गार्डन्स’चे नवे नामकरण केंद्र सरकारने केले आहे. विविध प्रकारच्या फुलझाडांचे हे उद्यान आता ‘अमृत उद्यान’ म्हणून संबोधले जाणार आहे. मुघल हे परकीय आक्रमक होते. या परकीय आक्रमकांच्या खाणाखुणा पुसून टाकण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
आता हे अमृत उद्यान 31 जानेवारीपासून 26 मार्चपर्यंत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुले केले जाणार आहे. नुकताच भारताने आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. यानिमित्ताने राष्ट्रपती भवनातील बागेचे नाव ‘अमृत उद्यान’ ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारने केले आहे.
15 एकरात आहे उद्यान
पर्यटकांच्या आकर्षणाचे नेहमीच केंद्र राहिलेले हे उद्यान विविध प्रकारच्या फुलझाडांनी नेहमी बहरलेले असते. या उद्यानात 129 प्रकारच्या गुलाबांची झाडे आहेत. हे त्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्टय़ आहे. याचे पूर्वीचे नाव मुघल गार्डन्स असे असले तरी ते मुघलांनी निर्माण केले नव्हते. त्याची निर्मिती एडविन ल्युटीयन नामक ब्रिटीश तज्ञाने केली होती. या उद्यानची निर्मिती करण्यापूर्वी त्याने अन्य काही देशांमधील मोठय़ा उद्यानांचा अभ्यास केला. त्यानंतर जगभरातून विविध प्रजातींची फुलझाडे मागवण्यात आली. या उद्यानाच्या जागेत फुलझाडांची लागवड करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागल्याची नोंद आहे.
एक उद्यानसमूह
अमृत उद्यान हे एकसंध उद्यान नाही. तो एक उद्यानसमूह आहे. पंधरा एकर जागेत एकंदर 10 उद्याने आहेत. गुलाब, इतर विभिन्न फुलझाडे, मध्यवतीं स्थानी हिरवळ, 33 प्रकारांच्या औषधी वनस्पती, अडीचशे बोन्साय, 80 प्रकारचे निवडुंग, 27 नक्षत्र फुलझाडे याशिवाय 160 भिन्न भिन्न प्रकारचे 5 हजार वृक्ष आहेत. येथील नक्षत्र उद्यानात फेब्रुवारी ते मार्च असे दोनच महिने प्रवेश दिला जातो.
निःशुल्क प्रवेश
या उद्यानात निःशुल्क प्रवेश दिला जातो. आपल्या मित्रमंडळींसमवेत वेळ घालविण्यासाठी हे स्थान अतिशय योग्य आहे, असे अनेकांचे मत आहे. दुपारी 12 ते रात्री 9 अशा वेळेत 31 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत या उद्यानाला भेट देता येते. मात्र खाण्याचे पदार्थ घेऊन जाऊन ते तेथे खाण्यास प्रतिबंध असल्याचे सांगण्यात येते. उद्यानाची स्वच्छता राखण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. मात्र, उद्यानात किती वेळ असावे यासंबंधी कोणताही प्रतिबंध नाही. रात्री 9 वाजता उद्यानाचे मुख्य द्वार बंद केले जाते.
अनेक नावांचे परिवर्तन
मुघल गार्डन्सचे नवे नामकरण करण्यापूर्वी अनेक ऐतिहासिक स्थानांच्या नावांचे परिवर्तन करण्यात आले आहे. दिल्लीतील औरंगजेब मार्गाचे नाव आता अब्दुल कलाम मार्ग असे आहे. रेसकोर्स मार्गाचे नाव लोक कल्याण मार्ग कसे करण्यात आले आहे. फिरोजशहा कोटला मैदानाचे नाव अरुण जेटली मैदान असे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘अमृत उद्यान’ हे नाव अस्तित्वात आले आहे.
भारतीय पद्धतीचे नामकरण…
ड भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे नूतन नामकरण
ड ‘अमृत उद्यान’ हे सातत्याने राहिले आहे पर्यकटकांचे आकर्षणकेंद्र
ड विविध प्रकारांच्या गुलाबांसाठी आणि टय़ूलिपसाठी उद्यान प्रसिद्ध
ड 160 प्रकारांचे वृक्ष, 33 प्रकारांच्या औषधी वनस्पती अशी वैशिष्टय़े