ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यभरात सध्या नवरात्रीची धूम आहे. यानिमित्ताने अनेक राजकीय पक्षांकडून रास-दांडीयांचे आयोजन केले जात आहे. भाजपनेही मराठी दांडीयांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारतीय जनता पक्षानं (BJP) मुंबईत आयोजित केलेल्या मराठी दांडियावर शिवसेनेनं Shivsena) ‘सामना’च्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे. कमळाबाईच्या मराठी दांडियानं शिवसेना इंचभरही हलणार नाही, असा बोचरा टोला शिवसेनेनं हाणला आहे. शिवसेनेच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावरील एक पत्रच आशिष शेलार यांनी सोशल मीडियात शेअर केले आहे.
‘अयोध्येतील राम मंदिरासाठी काढल्या जाणाऱ्या वर्गणीची ज्यांनी खिल्ली उडवली. अडीच वर्षे राज्यात सत्ता असताना देवांना बंदीवान केलं. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सवावर निर्बंध लादले, त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेली उत्सवाची धूम पाहवत नाही. त्यांच्या पोटात मळमळ होतेय, मुरड पडतेय म्हणून ते जळजळ व्यक्त करत आहेत. मराठी माणसाचा उत्सव आणि आनंद पाहून ज्यांना असा त्रास होतोय, त्यांनी ‘धौती योग’ घ्यावा, असा खोचक सल्ला शेलार यांनी दिला आहे.
हे ही वाचा : लतादीदींच्या जन्मदिनानिमित्त राज ठाकरेंनी दिला आठवणींना उजाळा, पोस्ट व्हायरल
भाजप दरवर्षीच दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव साजरा करतो. आम्ही महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. त्याचं कधीच राजकारण केलं नाही. करोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळं आम्ही जे केलं, त्याचं ‘करून दाखवले’ असे होर्डिंग लावले नाहीत, असा टोलाही शेलार यांनी हाणला आहे.