स्मशानभूमीला स्क्रॅपयार्डचे स्वरुप : वाहने पार्किंगमुळे नागरिकांसमोर प्रश्न : खुल्या जागांचा वापर गरजेचा : मनपाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या वाहनांसाठी सदाशिवनगर स्मशानभूमीशेजारी गॅरेजची उभारणी करण्यात आली आहे. मात्र ही जागा अपुरी पडू लागल्याने नव्याने दाखल झालेली कचरावाहू वाहने चक्क सदाशिवनगर स्मशानभूमीत पार्क करण्यात आली आहेत. त्यामुळे मनपाच्या वाहनांचे पार्किंग तळ की स्मशानभूमी? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
यापूर्वी महापालिकेची कचरावाहू वाहने महापालिका मुख्य कार्यालय, कला मंदिर आणि सदाशिवनगर स्मशानभूमीत पार्क करण्यात येत होती. शववाहिका मठ गल्ली येथील पाण्याच्या टाकीशेजारी आणि कोनवाळ गल्ली विभागीय कार्यालयाच्या आवारात पार्क करण्यात येतात. मात्र, कचरावाहू वाहनांमुळे दुर्गंधी पसरत असल्याने गॅरेज निर्माण करून त्या ठिकाणी सर्व वाहने पार्क करण्यात यावीत, तसेच सर्व्हिसिंग, दुरुस्तीची कामे गॅरेजमध्ये करण्यात यावीत, अशी सूचना करण्यात आली होती. त्याकरिता सदाशिवनगर स्मशानभूमीशेजारी खुल्या जागेत गॅरेज निर्माण करण्यात आले आहे. सध्या सर्व वाहने या ठिकाणी पार्क केली जातात. तसेच वाहनांच्या दुरुस्तीचे कामही या ठिकाणी केले जाते. पण गॅरेजची जागा मनपाच्या वाहनांसाठी कमी पडू लागल्याने मागील बाजूस असलेल्या जागेत वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे स्क्रॅप आणि नादुरुस्त वाहने सदाशिवनगर स्मशानभूमीत पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीला स्क्रॅपयार्डचे स्वरुप प्राप्त झाले
आहे.
घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यासाठी हंगामी तत्त्वावर वाहने घेण्यात आली आहेत. मात्र, महापालिकेला उपलब्ध झालेल्या निधीअंतर्गत स्वतःच्या मालकीची वाहने महापालिकेने खरेदी केली आहेत. नव्याने दाखल झालेली कचरावाहू वाहने चक्क स्मशानभूमीत पार्क करण्यात आली आहेत. या ठिकाणी पार्क करण्यात आलेली वाहने पाहता वाहनतळ की स्मशानभूमी? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. स्मशानभूमीच्या विकासाच्यादृष्टीने उपाययोजना राबविण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.
मात्र, स्मशानभूमीचा वापर वाहनतळासाठी केला जात आहे. शहरात महापालिकेच्या मालकीच्या असंख्य जागा असून काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. अशा जागा ताब्यात ठेवण्यासाठी महापालिकेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. खुल्या जागांवर गॅरेज निर्माण करून त्या ठिकाणी वाहने पार्क केली जाऊ शकतात. जागा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने खुल्या जागांवर वाहन पार्किंग करणे शक्मय आहे. पण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळेच स्मशानभूमीत पार्क करण्यात येणाऱया वाहनांमुळे वाहनतळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. या कारभाराबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.