बापट गल्ली, नार्वेकर गल्ली परिसरात धोकादायक घरे : नोटीस बजावून झटकली जबाबदारी
प्रतिनिधी /बेळगाव
पावसाळय़ात जीर्ण झालेली घरे कोसळण्याच्या घटना घडल्याने नुकसान होते. तसेच काहीवेळा जीवदेखील गमवावा लागतो. महापालिका व्याप्तीमध्ये अशा प्रकारची अनेक धोकादायक घरे आहेत. बापट गल्ली तसेच नार्वेकर गल्ली परिसरात धोकादायक घरे असल्याने ती कोणत्याहीक्षणी कोसळण्याची शक्मयता आहे. मात्र, याबाबत महापालिकेने केवळ नोटीस बजावून आपली जबाबदारी झटकली आहे.
शहरात दरवषी पावसाळय़ात शेकडो घरे कोसळण्याच्या घटना निदर्शनास येतात. महापालिका व्याप्तीमध्ये असंख्य धोकादायक इमारती असून, याबाबतची नोंद मनपा प्रशासनाकडे नाही. वास्तविक पाहता प्रत्येक इमारतीचे सर्व्हे करून याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. महापालिकेकडून घरपट्टी भरून घेतली जाते. त्यावेळी इमारतीचा तपशील घेतला जातो. अशावेळी धोकादायक इमारतीची पाहणी करून नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या महसूल विभागाकडून याबाबत कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे धोकादायक इमारतीची माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. पण शहरांतर्गत अनेक इमारती जीर्ण झाल्या असून, कोसळण्याचा धोका आहे. यापूर्वीची जुनी घरे विशेषतः मातीमध्ये बांधकाम केली आहेत. कौलारू घरे असल्याने पावसाळय़ात पाणी पाझरून घराच्या भिंती कमकुवत बनतात, त्यामुळे कोणत्याहीक्षणी कोसळण्याचा धोका असतो. शहरातील असंख्य जुन्या घरातील रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. तर ज्यांची परिस्थिती नाही ते नागरिक अद्यापही धोकादायक घरांमध्येच वास्तव्य करीत आहेत. बाजारपेठेंतर्गत असलेल्या गर्दीच्या ठिकाणी देखील काही धोकादायक जीर्ण झालेली घरे आहेत. यापैकी काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. काही भाग व्यवस्थित आहे. पण पावसामुळे कमकुवत बनल्या आहेत.
या इमारती कोसळल्यास शेजारी असलेल्या इमारतधारकांना याचा धोका आहे. शेजारील घरामध्ये नागरिक रहात असल्याने त्यांच्या जीवालादेखील अशा इमारतींचा धोका असल्याने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
खबरदारी घेण्याची मागणी
शहरात बापट गल्ली, नार्वेकर गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार, कचेरी रोड, रामलिंगखिंड गल्ली अशा विविध ठिकाणी धोकादायक घरे आहेत. पण महापालिका प्रशासनाने अशा घरांकडे कानाडोळा केला आहे. वास्तविक पाहता या घरांची नोंद घेऊन खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, महापालिकेकडून केवळ नोटीस बजावून जबाबदारी झटकण्यात आली आहे. अशा इमारतींमुळे अन्य इमारतींचे नुकसान होण्याची शक्मयता असल्याने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.