जयसिंगपूर/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील जनतेने माझ्यावर अमाप प्रेम केले आहे, जनतेच्या या प्रेमामुळेच राज्याच्या विधीमंडळामध्ये शिरोळ तालुक्यातील जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे. तालुक्यातील सर्वच जाती धर्माच्या जनतेने दिलेले आशिर्वाद आणि उत्स्फूर्त पाठिंब्यामुळेच मी आमदार होऊ शकलो, याची मला जाणीव आहे आणि नेहमी राहिल. तालुक्याच्या चौफेर आणि सर्वांगीन विकासासाठी मला सत्तेत सहभागी व्हावे लागले तरी जात-पात, धर्म–भेद हे विचार मला कधीच स्पर्श करु शकत नाहीत. शिरोळ तालुक्याच्या वेगवान प्रगतीसाठी माझी बांधिलकी शिरोळ तालुक्यातील जनतेबरोबर आहे अणि ती कायम राहिल असे उद्गार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना काढले आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना मी वचन नाम्याद्वारे शिरोळ तालुक्यातील जनतेला शब्द दिला होता. तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय औद्योगिक वसाहत उभारण्या बरोबरच नवनवे प्रकल्प उभारले जातील, गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रे सक्षम करण्याबरोबरच सर्व रोगांवर उपचार करणारे मोठे रुग्णालय उभारले जाईल, गावागावांचा विकास साधताना गावांमधील अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायतीच्या इमारती, विविध जाती धर्मांच्या लोकांसाठी सामाजिक सभागृहे, सांस्कृतिक भवन उभारणे, युवकांसाठी व्यायाम शाळा, उदयोन्मुख खेळाडूंसाठी तालुकास्तरावर सुसज्ज क्रिडा संकुल उभारणे. तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे या व या सारख्या विकासाच्या बाबी पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला होता.
अपक्ष म्हणून निवडूण आल्यानंतर सर्वांशी चर्चा करुन आपण सत्तेबरोबर राहण्याचा जो निर्णय घेतला केवळ या मुळेच कोरोना सारखी महामारी आली असताना राज्य सरकार समोर आर्थिक संकट उभे असताना देखील अवघ्या अडीच वर्षात 380 कोटी रुपयाचा निधी शिरोळ तालुक्यासाठी आणता आला. हे नाकारता येणार नाही आणि केवळ या मुळेच जाहिरनाम्यात समाविष्ठ केलेली अनेक कामे पूर्णत्वाकडे नेता आली आहेत याचाच भाग म्हणून टाकळीवाडी, अकिवाट परिसरामध्ये शासकीय औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मान्यता मिळाली आहे व याकामी शासकीय कमिटीने त्या परिसराचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे, उदगांव येथे जिल्हा ग्रामिण रुग्णालय मंजूर होऊन त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे, यासाठी 16 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. शिरोळ येथे भव्य क्रिडा संकूल मंजूर असून त्यासाठी 7 एकर जागा संपादित केली आहे. शिरोळसाठी नविन सबस्टेशन मंजूर करुन घेतले असून यासाठी 5 एकर जागा संपादित केली आहे, तसेच तालुक्यातील 12 हजार हेक्टर क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण मंजूर झालेल्या 52 लाखाच्या निधीतून पूर्ण झाले असून, क्षारपड जमीन सुधारणा योजनेसाठी 80% शासन निधी मिळावा यासाठी 125 कोटी निधीसाठीचा प्रस्ताव शासनाच्या जलसंधारण विभागाकडे सादर केला आहे. खिद्रापूर येथील पुरातन कोपेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी राज्यशासनाने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन लगत 2.5 कोटी रुपये खर्चाच्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारत बांधकामास सुरुवात झाली आहे. जयसिंगपूर व आगर येथे मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारणेसाठी मंजूरी मिळाली असून या इमारतींची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पुतळे उभारणेसाठी मान्यता मिळाली असून हे दोन्ही पुतळे लवकरच उभारले जातील. 105 कि.मी. पाणंद रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. त्यामुळे अनेक वर्षे प्रलंबित असणारा शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. याच बरोबर आणखी बरीच कामे मंजूरीसाठी शासन दरबारी प्रस्तावित आहेत आणि ती पूर्ण करणे माझी जबाबदारी आहे असेही राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी म्हटले आहे. तालुक्याची चौफेर प्रगती झाली पाहिजे हा प्रामाणिक हेतू डोळयासमोर ठेवून माझी वाटचाल सुरु आहे आणि राहिल असे सांगताना जात, धर्म, वंशभेद आमच्या रक्तात नाही, अपक्ष ही माझी भूमिका कायम राहील आणि सर्वांना सोबत घेवून काम केले जाईल असेही राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी शेवटी म्हटले आहे.