ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुरोगामी महाराष्ट्राचा आणि महापुरुषांचा अवमान करणे हा भाजपचा अजेंडा आहे. हाच अजेंडा राबविण्यासाठी कोश्यारींची नियुक्ती करण्यात आली होती. महापुरुषांचा अवमान करणारी सातत्याने वक्तव्य करत कोश्यारींनी राज्यपालपदाची गरिमा घालवली आहे. भाजपला त्यांच्या पापाची भोगावीच लागतील, अशी टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली.
पटोले म्हणाले, कोश्यारींनी भाजपचा अजेंडा राबविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांचा वारंवार अवमान केला. महापुरुषांच्या सततच्या अवमानानंतर कोश्यारींना राज्यभरातून कडाडून विरोध होऊ लागला. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली. मात्र, भाजपने त्यांची हाकालपट्टी केली नाही. उलट त्यांचा राजीनामा मंजूर करुन भाजपने महाराष्ट्राचा अवमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजप कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. असे राज्यपाल मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पण भाजपने जी पापं केली आहेत, त्याची फळं त्यांना भोगावीच लागतील.
अधिक वाचा : …तर पंतप्रधान अदानींवर का बोलत नाहीत?; नाना पटोले यांचा सवाल
कोश्यारींनी अनेकदा घटनेची पायमल्ली केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. केंद्र शासनाने त्यांची हकालपट्टी करायला हवी होती. हकालपट्टी करून चौकशी लावली असती तर केंद्र सरकारची घटनेप्रती निष्ठा दिसली असती. पण तसे न करता कोश्यारींचा राजीनामा मंजूर करत त्यांना सन्मानाने निवृत्ती दिली.