अध्याय सत्ताविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा संस्कृत येत नसल्याने किंवा योग्य व्यक्तीकडून स्तोत्र कसे म्हणावे याचे शिक्षण न मिळाल्याने शुद्ध रीतीने स्तोत्रपठण करता येत नाही किंवा गाणे शिकलेले नसल्याने ते तालासुरात म्हणता येत नाही असाही भक्त मला आवडतो. स्तोत्र किंवा गाणे प्रेमाने म्हणणाऱ्याला दोष तर लागत नाहीच, उलट त्याच्या योगाने महादोषाचे निर्दालन होत असते. वेदातील उपनिषदांचे पठण किंवा ऋचामत्रांनी हरीचे स्तवन, ह्यामध्ये काही लोक श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेद करतात परंतु देवाला भक्ताचा भक्तीभाव जास्त प्रिय असल्याने त्याच्या दृष्टीने श्रेष्ठ, कनिष्ठ असे काहीही नसते. दोन्हीही त्याला सारखेच प्रिय आहेत. म्हणून इतर भक्त माझी स्तुतिस्तोत्रं व पुराणे याबद्दल सांगत असताना किंवा स्तोत्रे म्हणत असताना ती आदरपूर्वक श्रवण करावीत. त्यातील माझे केलेले वर्णन चित्तात साठवून ठेवावे. भक्ताने स्वत: हरिकथेचे मर्म समजावून घ्यावे आणि कोणी श्रोते मिळाल्यास कथेचे निरूपण करावे. माझे नाम घेऊन मला प्रेमाने मारलेली हाक मला फार आवडते. म्हणून सांगतो की, मोठे थोरले स्तोत्र म्हटले काय आणि फक्त नाम घेतले काय, अर्थाने आणि भावाने खरोखर मी ती सारखीच मानतो. एखादा भोळाभाबडा मनुष्य असून त्याला वेद, शास्त्र, पुराण काहीच कळत नसले आणि त्याने प्राकृत भाषेतच स्तवन केले, तरीसुद्धा मी श्रीकृष्ण संतुष्ट होतो. भगवंतांचे हे मनोगत संपूर्णपणे जाणलेले संत चोखामेळा महाराज देवाला आळवताना त्यांच्या अभंगातून त्यांचा भोळा भाव व्यक्त करताना म्हणतात, आह्मा नकळे ज्ञान, न कळे पुराण, वेदाचे वचन नकळे आह्मा, आगमाची आढी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आह्मा, योग याग तप अष्टांग साधन, नकळेची दान व्रत तप, चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझे. ते असं म्हणतात कारण, नाम घेऊन केशव प्रसन्न होईल याची त्यांना पूर्ण खात्री आहे. वेद पठण करताना एखादा स्वर वर्ण चुकला, तर पठण करणाऱ्याला भयंकर दोष लागतो. तो टाळण्यासाठी प्राकृतामध्ये श्रीहरीचे स्तवन केले, तरीही दोषाचे निर्दालन होते. शास्त्रश्रवणाला किंवा पुराणप्रवचनाला पंचमी-सप्तमी इत्यादि विभक्तीचे ज्ञान असावे लागते परंतु प्राकृत नामकीर्ती अशुद्धपणे जरी गाइली, तरी ती भगवतप्राप्ती करून देणारीच होते. संस्कृत भाषा देवाने केली आणि प्राकृत भाषा काय चोरापासून झाली? ही केवळ पक्षाभिमानाची बोलणी आहेत. देवाची रीत निरभिमानत्वाची आहे. वेदशास्त्र असू द्या की पुराण असू द्या किंवा प्राकृत भाषेचे स्तवन असू द्या, देवाला काहीच फरक पडत नाही कारण देवाला त्यातील भक्तिभावच मुख्य वाटतो. त्यानेच नारायण संतुष्ट होतो. देवाला भक्ति-प्रेमाचीच आवड आहे. तो भाषेचे अवडंबर पहात नाही. भाविकांचा भावार्थच त्याला गोड लागतो. त्यामुळे देवाला भक्तांची भीड मोडवत नाही. तात्पर्य, भक्तिभावाने स्तवन केले असता देव भक्तांच्या अधीन होतो. याकरिता भक्तिभावानेच नमस्कार करून हरिचरणी मिठी घालावी. क्षणभरही जर हरिचरणी मन सुखावले, तर त्या सुखाने इतर व्यवसाय सहजच खुंटतात. ज्यायोगे माझे अनुसंधान तुटेल, ते कर्म आपण सोडून द्यावे आणि ज्यायोगे मन स्वरूपनिष्ठ होऊन राहील, तसलेच समाधान राखावे. हे सर्व वाचल्यावर, केवळ हरि चरणी मिठी घालायला मिळावी ह्या एका इच्छेपायी वारकरी मैलोनमैल चालत पंढरीला येतात आणि हरिचे चरण धरून तृप्त मनाने परत जातात, ह्यामागचे रहस्य भगवंतांचे मनोगत समजून घेतले की, लगेच लक्षात येते. भगवंताला सप्रेम नमन केले असता नित्य नवे समाधान लाभते. अशा पद्धतीचे नमन लोटांगण आणि दंडवत घालून करतात. ज्याप्रमाणे हातातून दांडा सुटून खाली पडत असता तो जसा सरळ जमिनीवर लोटांगण घालतो, त्याप्रमाणे देहाभिमान टाकून, कसलाही अनमान न करता अहेतुकपणे लोटांगणे घालावीत. मी कर्ता आहे किंवा मी म्हणजे हा देह होय हे विसरणे सहजासहजी शक्य नसते.
क्रमश: