चंद्रभागेत स्नान करून वारीचे केले विसर्जन : पंढरपुरात भक्तीचा महापूर
प्रतिनिधी /डिचोली
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठुरायाच्या चरणी प्रथमच पायी वारी घेऊन निघालेले आमोणा सांखळी येथील ओम नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ नाव्हेली येथील लक्ष्मीनारायण वारकरी मंडळाचे वारकरी पंढरपूर त दाखल झाले आहेत. दोन्ही वारींमधील सर्व वारकरी सुखरूप असून उत्साहात आहेत, असे सांगण्यात आले.
आमोणा येथील ओम नमो ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळाची वारी 24 जून रोजी घाडीवाडा आमोणा येथून बाहेर पडले होते. या वारीत एकूण 65 वारकरी असून 13 दिवसांचा पायी प्रवास करून वारकरी गुरुवारी दि. 7 जुलै रोजी रात्री पंढरपुरात दाखल झाले. या वारीत 65 वारकरी आहेत. पंढरपूरात दखल होताच सर्व वारकऱयांच्या मुखातील विठुरायाच्या नामघोष दुमदुमला. सर्व वारकऱयांच्या तोंडावर भक्तिपूर्ण उत्साह ओसंडून वाहत होता, असे या वारकरी मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ म्हाथो यांनी सांगितले.
नाव्हेली येथून निघालेली लक्ष्मीनारायण वारकरी मंडळाची वारी काल शुक्र. दि. 8 रोजी सकाळी पंढरपूरला दाखल झाली. या वारीत 70 वारकरी सहभागी झाले असून एकूण 354 किमी अंतर पायी कापून बारा दिवसांच्या प्रवासानंतर ही वारी पंढरपुरात दाखल झाली आहे. पंढरपूरला पोहोचताच सर्व वारकऱयांनी चंद्रभागेत स्नान केले. तेथे रिंगण करीत आपली सेवा रूजू केली. नंतर आरती करण्यात आल्या व वारीचे विसर्जन करण्यात आले. वारकऱयांनी संत नामदेवांच्या पायरीचे दर्शन घेतले व नंतर विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.
पायीवारी करून पंढरपुरात दाखल होणे हा अनुभवच अनोखा असतो. देव विठ्ठल जणू आमच्यात सामावून ही वारी यशस्वीपणे पूर्ण करून घेत असतो. या वारीतील सर्व वारकरी सुखरूप असून वारीला वाटेत कोणत्याही समस्या आल्या नाहीत, तसेच पावसाचाही अडथळा आला नाही, असे या लक्ष्मीनारायण वारकरी मंडळाचे अध्यक्ष महादेव गावस यांनी सांगितले.