राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांचा आरोप : मोठय़ा नेत्यांशी जवळीक साधून मोठं होण्याचा वाघ यांचा उद्योग: वाढत्या महागाईविरोधात राज्यभर आंदोलन करणार- चव्हाण
प्रतिनिधी/कोल्हापूर
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना काहीतरी मोठं दान पदरात पाडून घ्यायचं आहे. मोठ्य़ा नेत्यांशी जवळीक साधायची आणि मोठं व्हायचं अशी त्यांची निती आहे. ‘सरशी तिकडे पारशी’ अशी चित्रा वाघ यांची अवस्था झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी केला.
विद्याताई चव्हाण यांनी शनिवारी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये जिल्हा व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महिलांच्या अडीअडचणी अणि त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची माहिती जाणून घेतली. यामध्ये महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवला. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य महिला कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर यांच्यासह महिला कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
चव्हाण म्हणाल्या, राज्यातील महिलांच्या समस्या, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आठ विभागात विभागीय अध्यक्षांची निवड केली असून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. राज्यातील महिलांच्या बैठकांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलसह जिवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई, बेरोजगारी हे प्रश्न महिलांनी प्राधान्याने मांडलेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात 2 कोटी युवकांना नोकऱ्या देणार असे जाहीर केले होते. पण त्याची कितपत अंमलबजावणी झाली हा संशोधनाचा विषय आहे. केवळ गाजर दाखवून मते मिळवायची हा भाजपचा अजेंडा आहे.
महागाईविरोधात पावसाळ्यानंतर राज्यभर आंदोलन
वाढलेल्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर राज्यभर आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करून घरगुती गॅससाठी 1 हजार रूपये आणायचे कोठून? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.
राज्यात पुढील 50 वर्षात भाजपची सत्ता येणार नाही
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. या तिन्ही पक्षात कोणताही विसंवाद नाही. त्यामुळे आगामी 50 वर्षात राज्यात भाजपची सत्ता येणार नसल्याचे विद्याताई चव्हाण यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीविरोधात बोलण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर व नारायण राणे यांना पक्षात घेतले असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.