मुंबई/प्रतिनिधी
शरद पवार (sharad pawar) मुख्यमंत्री असते तर राज्यात वेगळी परिस्थिती असती असे वक्तव्य अमरावती (amravati) येथे करणाऱ्या काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव देण्याचा सल्ला दिला आहे.
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी अमरावती येथे शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतेच, परंतु आज काळाची गरज आहे. ते आपल्या सोबत आहेत, म्हणून कोणी कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, असा विश्वासही व्यक्त केला होता. अमरावतीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजलीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री सुनील केदार (sunil kedar) मंचावर उपस्थित होते.
या वक्तव्याची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद राव पवार यांच्या नेतृत्व आणि कार्यक्षमतेबाबत कोणती शंकाच नाही. मला तर वाटते पवार यांना यूपीएचे अध्यक्ष केले पाहिजे. त्यामुळे संपूर्ण भारतालाच त्यांचा उपयोग होईल. असा प्रस्ताव यशोमती ताई तुम्ही द्याल का? असा सवालही त्यांनी केला आहे. महा विकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची वक्तव्ये आणि त्यामुळे निर्माण होणारा बेबनाव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.