वार्ताहर /कांदोळी
नेरुल येथील मोबाईल टॉवर हटविण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली मागणी मान्य न झाल्यामुळे सोमवार दी. 1 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता नेरूल ग्रामस्थांनी पुन्हा एकदा रस्त्यावर ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन केले. मात्र उपजिल्ह़ाधिकाऱयांनी टॉवर बांधकामाला स्थगिती दिल्याने ग्रामस्थांनी सायंकाळी आंदोलन मागे घेतले.
नेरूल ग्रामस्थांनी दि. 28 जुलै रोजी पहिले रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलकांना उपजिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी मोबाईल टॉवरला सोमवार पर्यंत काम स्थगित ठेवण्याचा आदेश देण्याचे लेखी आश्वासन देण्यात येणार असे सांगितले होते. तसा आदेशही बांधकाम कंत्राटदाराला दिला होता. परंतु आज सोमवारी त्यावर काहीच चर्चा न झाल्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा रस्ता रोको आंदोलन केले. मोबाईल टॉवर हटविल्याशिवय येथून उठणार नाही, असा निर्धार आंदोलनकांनी केला.
यावेळी पोलिस उपअधीक्षक विश्वेश्वर कर्पे, निरीक्षक अनंत गावकर, उपनिरीक्षक भट हे पोलीस घटना स्थळी पोहचले व रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ग्रामस्थ ठाम असल्यामुळे ते रस्त्यावरून दूर झाले नाहीत.
नेरूल येथील आंदोलक माघार घेण्याच्या तयारीत नसल्याने शेवटी बार्देश तालुका उपजिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी घटनास्थळी जावून आंदोलकांशी चर्चा केली. मोबाईल टॉवरच्या बांधकामाला दि. 16 ऑगस्ट पर्यंत स्थगिती देण्याचा आदेश दिला. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता नेरूल ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.