ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तीन्ही दलाच्या सेवा प्रमुखांनी पत्रकार परिषदेत बहुचर्चित ‘अग्निपथ’ नावाच्या अल्प-मुदतीच्या सैन्य भरती ही योजना जाहीर करून त्यासंबंधी माहिती दिली. पगारांचा फुगवटा आणि वाढती पेन्शनची बिले कमी करण्याचा उद्देश असलेली ह्या योजनेचे केंद्र सरकारने अनावरण केले.
येत्या सहा ते सात वर्षांत सैनिकांचे सरासरी वय 32 वर्षावरून कमी करून ते 26 वर्षे करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे तरुण, नवीन तंत्रज्ञान जाणणारे, भविष्य घडवण्यासाठी सज्ज असतील. हे सैनिक देशाचे अग्निवीर म्हणून ओळखले जातील.
योजनेच्या शुभारंभप्रसंगी, “अग्निवीर हा भारताचा तरुण संरक्षणकर्ता असेल. चार वर्षे आमच्यासोबत राहिल्यानंतर, अग्निवीरचा बायोडेटा खूपच वेगळा असेल. तो त्याची वृत्ती, कौशल्य आणि आमच्यासोबत घेतलेल्या प्रशिक्षणामुळे गर्दीत उठून दिसेल” असे लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले.
या नवीन योजनेअंतर्गत, 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील सुमारे 45,000 लोकांना सैनिकी सेवांमध्ये समाविष्ट केले जाईल. ही सेवा आणि ते चार वर्षे सेवा देतील. या चार वर्षांच्या कार्यकाळात सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा समावेश असेल. प्रशिक्षण कालावधीत, त्यांना मासिक वेतन 30,000 ते 40,000 रुपये अधिक भत्ते दिले जातील. त्यांना वैद्यकीय आणि विमा लाभ देखील मिळतील.
चार वर्षांनंतर, यातील केवळ 25 टक्के सैनिकांना कायम केले जाऊन ते नियमित केडरमध्ये सामील होतील. सामिल झालेले 15 वर्षे बिगर अधिकारी पदावर सेवा देतील. बाकीचे 11 लाख ते 12 लाख रुपयांच्या पॅकेजसह सैनिकी सेवांमधून बाहेर पडतील. सैनिकी सेवांमधून बाहेर पडलेले पेन्शनच्या लाभांसाठी पात्र नसतील.
“या योजनेमुळे वार्षिक महसूल आणि पेन्शन बिलात मोठ्या प्रमाणात कपात होईल जी वार्षिक संरक्षण बजेटच्या निम्मे म्हणजे 5.2 लाख कोटी रुपयांच्या आसपास असेल.” असे सरकारने म्हटले आहे.