महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत दररोज जे काही घडत आहे, ते ‘ऐकावे ते नवलच’ अशा प्रकारचे आहे! सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायाधीशांनी तत्काळ काही निर्णय घेतले असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. आता ती निस्तारण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करत आहेत. पण तोपर्यंत नवे नवे धक्क्यावर धक्के देण्याचे प्रकार शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून सुरू आहेत. आधी त्यांनी बंड केले, मग उध्दव ठाकरेंना पायउतार केले, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, विधानसभा अध्यक्ष निवड करुन उध्दव ठाकरेंच्या जुन्या पत्राच्या आधारे शिंदेंची गटनेतेपदी फेर नियुक्ती केली. त्याच पत्रातील सुनील प्रभू यांच्या प्रतोदपदाऐवजी गोगावलेंची निवड नव्या अध्यक्षांकडून करुन घेतली. एकनाथ शिंदेंनी पक्षावर दावा केला, ठाकरेंनी हाकललेल्या पदाधिकाऱयांना पुन्हा नियुक्ती जाहीर केली, आणि आता तर पक्षाची मूळ कार्यकारिणी बरखास्त करुन आपल्याला हवी तशी कार्यकारिणी निवडून त्यात उध्दव ठाकरे यांना नामधारी प्रमुख व स्वतःस मुख्य नेता जाहीर केले. अर्थात सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेवर खंडपीठ निर्णय घेईल तेव्हा चित्र स्पष्ट होईल. फुटलेले आमदार केवळ सोळाच आहेत की 39? त्या 39 आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता द्यायची की ती मान्यता न घेताच शपथविधी केला म्हणून अपात्र ठरवायचे? या आणि अशा विविध पेचांवर न्यायालय निर्णय घेण्यास पूर्णतः सक्षम आहे. जनता या निकालाकडे डोळे लावून बसली आहे. त्याचवेळी बंडखोर गटांने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तो बिनतोड नसला तरी त्यांचे ऐकावे लागेल इतके आमदार आणि खासदारांचे संख्याबळ त्यांच्यासोबत आहे. म्हणजेच शिवसेना या नोंदणीकृत राजकीय पक्षाचा संसदीय आणि विधिमंडळ पक्ष दुभंगलेला आहे. 55 पैकी चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आहेत. तर सोमवारी पक्षातील अठरा पैकी बारा खासदार शिंदे यांना सामील होतील हे स्पष्ट झालेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असणारे कार्य आपण करत आहोत असा त्यांचा दावा आहे. आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून शिंदे स्वतः भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले आहेत. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सेनेवर हक्क सांगत व दाखवत आहेत. फुटीर आमदार, खासदारांचा आकडा मोठा असल्याने त्यांचा दावाही भक्कम आहे. पण पक्ष आणि विधीमंडळ पक्ष वेगळा असतो. यावर ही लढाई सुरू आहे. विविध पक्षांमध्ये फूट पाडून राज्याराज्यात ऑपरेशन कमळ राबवून सत्ताधारी होण्याचे भाजपचे देशभर प्रयत्न यशस्वी झाले आहेत. शिवसेना हा भाजप प्रमाणेच हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे आणि दोन हिंदुत्ववादी पक्ष आता भाजपला नको आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसशी युती करून भाजपला गेली अडीच वर्षे दुखावले आहे. तिथे फुटीचा उपयोग करून या पक्षाच्या अस्तित्वालाच आव्हान देणे सध्या सुरू झाले आहे. अर्थात एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ते उद्धव ठाकरे हेच आपल्या पक्षाचे नेते असे पालुपद चालवत असले तरी ठाकरेंना हटवून त्यांना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे. त्यांचा मनसुबा त्यांनी बरखास्त म्हटलेल्या कार्यकारणीतून उघड झाला आहे. शिवसेना नेते, उपनेते आणि प्रवक्ते त्यांची निवड करताना सर्व नेते बाद करुन बंडखोरांची कार्यकारिणी करुन पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले आहे. अप्रत्यक्षरीत्या एकनाथ शिंदे यांनी आपणच पक्षाचे प्रमुख आहोत असे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याला कॉमेडी एक्सप्रेस सीझन टू असे म्हटले आहे. मात्र ही हसण्यावर घेण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही. एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही नवी प्रति शिवसेनाच आहे. पूर्वी बंडू शिंगरे यांनी बाळासाहेबांच्या हयातीत तसा प्रयत्न केला होता मात्र तो बाळासाहेबांनी संघटित शक्तीद्वारे मोडून काढला. सध्या अनेक नेते एकत्र येऊन ठाकरेंना मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपण म्हणजेच मूळ पक्ष आहोत असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. रोज एका बंडखोर नेत्याने पक्ष सोडायचा आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करायचा हा त्यांचा कार्यक्रम आहे. कधी आमदार आपल्या लोकांना घेऊन येतात, कधी फुटलेल्या आमदाराचे वडील नेतेपदाचा त्याग करतात, कधी फुटलेल्या नेत्याचा मुलगा युवा सेनेच्या पदाधिकाऱयांसोबत शिंदे यांचे फोटो सेशन करतो. अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक कृतीला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवायची आणि शिवसैनिकांच्या मनात गोंधळ माजवून उद्धव ठाकरे यांची बाजू अधिक कमकुवत करायची हा यामागील रणनीतीचा भाग आहे. अर्थात ठाकरे सध्या स्वतः मोठय़ा कोंडीत पडले असून ती फोडण्यासाठी त्यांना न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा आहे. राज्यातील अनेक घटना तज्ञांनी पक्षांतर्गत बंदी कायद्याचा अर्थ लावताना शिंदे गटाला जर स्वतःचे पद आणि सत्ता टिकवायची असेल तर स्वतंत्र गट म्हणून इतर पक्षात विलीन व्हावे लागेल किंवा बडतर्फी ओढवून घ्यावी लागेल असे म्हटले आहे. विलीन व्हावे लागले तर ते शिवसेनेवर दावा करु शकणार नाहीत. न्यायालयात शिंदे यांच्या बंडाचे भवितव्य ठरणार आहे. ते बंड ठरो की उठाव. पक्षांतर्गत बंदी कायद्याचा उहापोह या निमित्ताने होणारच आहे. तोपर्यंत संभ्रमाची परिस्थिती राहील तेवढा शिंदे गटाचा आणि त्याच्या पाठीशी असलेल्या महाशक्तीचा फायदा होणार आहे. आता शिंदे गटाच्या बाबतीत कोणताही निर्णय झाला तरी तो त्यांच्यासाठी बोनसच असणार आहे. यातून कोणाची बडतर्फी झाली तरी घटलेल्या बहुमताच्या आकडय़ाच्या साहाय्याने सत्तेवर दावा, राष्ट्रपती राजवट किंवा पोट/फेरनिवडणुका यापैकी कोणताही पर्याय त्यांच्या फायद्याचाच आहे. मूळ झुंज होणार आहे ती उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची प्रति शिवसेना यांच्यात. मुंबई महापालिकेच्या दरम्यान ते जितके एकमेकांशी झुंजतील तेवढे महाशक्तीला हवेच आहे.
Previous Articleभारताविरुद्धच्या मालिकेसाठी विंडीज संघ जाहीर
Next Article वनडे मानांकनात भारत तिसऱया स्थानी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.