सॉफ्ट सिग्नल पद्धत होणार हद्दपार : हेल्मेटबाबतही नवा नियम लागू होणार
वृत्तसंस्था/ लंडन
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल ग्राउंडवर 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत कांगारूंना पाणी पाजून टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचा खिताब पटकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडियाने 2021 मध्ये या स्पर्धेची फायनल खेळली होती. यामध्ये न्यूझीलंडकडून भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र टीम इंडियाकडे मागचा पराभव विसरून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर कब्जा करण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, 7 जूनपासून खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापासूनच क्रिकेटविश्वात करण्यात आलेले अनेक बदल लागू होणार आहेत.
सॉफ्ट सिग्नल ‘आऊट
साधारणपणे फिल्ड अंपायरला निर्णय देण्यात अडचण आल्यास त्यात थर्ड अंपायरची मदत घेतली जाते. बॅट्समन कॅचआऊट आहे की नाही, रनआऊट, फोर आहे की सिक्स याबाबतचे अनेक बारीक आणि निर्णायक अशा निर्णयांमध्ये फिल्ड अंपायर थर्ड अंपायरची मदत घेतो. मात्र त्याआधी फिल्ड अंपायरला सॉफ्ट सिग्नल द्यावा लागतो. याबाबत फिल्ड अंपायरला काय वाटतं, हे जाहीर करावं लागतं. म्हणजे समजा बॅट्समन कॅचआऊट आहे, पण फिल्ड अंपायरला त्याबाबत थोडी शंका असेल, तर तो आधी आऊट असल्याचं जाहीर करतो, मग थर्ड अंपायरकडे जातो. त्यानंतर पुढे थर्ड अंपायर फिल्ड अंपायरने दिलेल्या निर्णयाच्या अनुषगांने तंत्रज्ञानाचा वापर करुन अचूक निर्णय देतो. मात्र अनेकदा निर्णय घेण्यात थर्ड अंपायरचा कस लागतो. त्यामुळे थर्ड अंपायर फिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम जाहीर करतो, तोच निर्णय कायम ठेवतो. त्यामुळे होतं काय, तर फिल्ड अंपायरने अंदाज्x दिलेला निर्णय हा अंतिम ठरतो, जो कधीकधी चुकीचाही असतो. त्यामुळे संबंधित खेळाडूसह टीमला नुकसान सहन करावे लागते. मात्र आता असे होणार नाही. आता यापुढे क्रिकेटविश्वातून हा निर्णय हद्दपार होणार आहे.
फ्लडलाईटमध्ये खेळवली जाणार फायनल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्या फायनलमध्ये, जर ढगाळ वातावरण असेल आणि नैसर्गिक प्रकाश तितकासा चांगला नसेल, तर फ्लडलाइट्स चालू करता येतील. तसेच या सामन्यासाठी 12 जून हा राखीव दिवस (सहावा दिवस) ठेवण्यात आला आहे.
हेल्मेटबाबतही नवा नियम
आयसीसीने 1 जूनपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान अटीतटीच्या लढतीत हेल्मेट घालणं बंधनकारक केले आहे. आता वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजाला हेल्मेट घालावे लागणार आहे. जेव्हा यष्टीरक्षक स्टंपजवळ उभे राहतात आणि फिल्डर्सही बॅटर्सच्या अगदी जवळ येऊन उभे राहतात, तेव्हा फलंदाजांना हेल्मेट घालणं अनिवार्य असणार आहे.
अंतिम सामना ड्यूक बॉलने खेळवला जाणार
भारतात कसोटी क्रिकेट एसजी चेंडूने आणि ऑस्ट्रेलियात कुकाबुरा चेंडूने खेळले जाते. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ड्यूक चेंडूने खेळवला जाईल. यामुळे दोन्ही संघात होणारी लढत निश्चितच चुरशीची होणार यात शंका नाही.