रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट
पुणे / प्रतिनिधी :
दक्षिण ओरिसा किनारपट्टीवर असलेले न्यून दाबाचे क्षेत्र तसेच पूर्वमध्य अरबी समुद्रात महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीलगत असलेले हवेचे द्रोणीय क्षेत्र यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्र तसेच गुजरातमध्ये जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता न्यून दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले असून, रविवारी हे क्षेत्र दक्षिण ओरिसाच्या किनारपट्टीजवळ होते. हे क्षेत्र पश्चिम-उत्तरपश्चिमेकडे सरकणार असून, येत्या 24 तासांत याचा प्रभाव कमी होणार आहे. याशिवाय अरबी समुद्रात हवेची दोणीय स्थिती असल्याने राज्यात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांत वाढ झाली आहे. यामुळे पुढील पाच दिवस राज्यभर जोरदार पाऊस राहणार आहे.
अधिक वाचा : लव्ह जिहाद प्रकरण भोवलं, नवनीत राणांवर गुन्हा दाखल
यात रविवारी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर येथे मुसळधार, तर राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सोमवारी याच भागात ऑरेंज अलर्ट असून, पुणे व साताऱ्यातील घाट क्षेत्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच संपूर्ण राज्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भात यलो अलर्ट आहे. बुधवारी राज्यभर यलो अलर्ट देण्यात आला आहे.