पुणे / प्रतिनिधी :
Next four days of rain in Maharashtra अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या अनेक भागाला गेले दोन दिवस पावसाने झोडपले आहे. सोमवारी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला असून, यामुळे राज्यभर दाणादाण उडाली आहे. राज्यातील अनेक भागांत पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असून, लवकरच त्याचे वादळात रुपांतर होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला आहे.
ऑक्टोबर महिन्यात राज्यभर पावसाने दाणादाण उडविली आहे. दिवसभर ऊन तसेच दुपारनंतर वादळी निरंतर सुरु असलेला पाऊस, अशी स्थिती सध्या राज्यभर सुरु आहे. दिवसभराच्या उन्हामुळे मोठय़ा प्रमाणात बाष्प वातावरणात पसरत आहे. त्यामुळे कमी कालावधीत ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले असून, यामुळे शेतातील उभी पिके नष्ट झाली आहेत, तर अनेक शहरात रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक वाहने रस्त्यावरच्या पाण्यात वाहून जात होती, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
अधिक वाचा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; मंत्री भुमरेंच्या मावस भावाचा मृत्यू
21 तारखेपर्यंत पाऊस
बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्राकडून जमिनीकडे मोठय़ा प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. याच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक भागात पुढील चार दिवस पाऊस पडेल. यात कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये पाऊस राहील.
बंगालच्या उपसागरात वादळाचे संकेत
दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात पुढील दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून, 22 ऑक्टोबरपर्यंत याची तीव्रता वाढणार आहे. त्यानंतर याचे वादळात रुपांतर होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. हे वादळ पश्चिम उत्तरपश्चिमेकडे प्रवास करणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिला आहे. या वादळाचे नाव ‘सितरंग’ हे असेल. दरम्यान, या वादळामुळे महाराष्ट्रात पाऊस होईल की नाही, हे काही दिवसांनंतर स्पष्ट होणार आहे.
मान्सून दोन दिवसांत महाराष्ट्रातून माघारी
विदर्भ, उर्वरित महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओरिसाचा काही भाग, संपूर्ण पश्चिम बंगालच्या उपसागरात परतीचा मान्सून येत्या दोन दिवसांत माघारी फिरेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.