पुणे / प्रतिनिधी :
शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा करण्याची आता परंपरा झाली असून, हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. या सोहळय़ासाठी राज्य सरकारचे सहकार्य अपेक्षित असून, रायगडावर येणाऱ्या कोणत्याही शिवभक्ताला अडवण्यात येऊ नये. तसेच रायगडाचा रांगडेपणा दाखविणाऱ्या या पारंपरिक सोहळय़ात नाटकीपणा असू नये, असे आवाहन ‘स्वराज्य संघटने’चे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केले.
पुण्याच्या शिवाजीनगरमधील स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. संभाजीराजे म्हणाले, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून हा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी साजरा केला जात आहे. यात तिथी वा तारखेचा वाद नाही. 6 जून याच दिवशी हा सोहळा साजरा करण्याबाबत सर्वांनी यापूर्वीच मान्यता दिली आहे. शिवराज्याभिषेक सोहळय़ाला यंदा 350 वर्षे होत असून, यानिमित्ताने अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळय़ात सेवा करण्यासाठी आणि त्यातील मान मिळविण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यामुळे या लोकोत्सवासाठी कुणालाही निमंत्रण दिले जाणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्त न चुकता याच दिवशी किल्ले रायगडावर येत आहेत. या शिवभक्तांच्या साक्षीने हा सोहळा पार पडतो. हा सोहळा जगभरात पोहोचण्यासाठी अनेक हात राबत असतात. त्यामुळे यासाठी सरकारचे सहकार्यही अपेक्षित आहे. मात्र, त्यात नाटकीपणा असू नये. आम्ही हा सोहळा इव्हेंट म्हणून करत नाही; तर हा लोकोत्सव आहे, असे यांनी सुनावले.
रायगडावर पार पडणाऱया सोहळय़ाची माहिती देताना संभाजीराजे यांनी 2018 साली झालेल्या गर्दी आणि कोंडीबाबत माहिती दिली. त्या वेळी गडावर येणाऱयांसाठी आणि परत जाणाऱ्यांसाठी एकच मार्ग होता. मात्र, या वेळी चार महिन्यांपासूनच दोन मार्ग सुरू केले आहेत. त्यात गडावर येणाऱ्यांसाठी एक मार्ग व पुन्हा खाली उतरण्यासाठी एक मार्ग असणार आहे. त्यामुळे गर्दी व कोंडी होणार नाही. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने 5 आणि 6 जून असा दोन दिवसांचा कार्यक्रम होतील. त्यामुळे पोलिसांनी रायगडावर येणाऱ्या कोणत्याही शिवभक्ताला अडवू नये. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी येणाऱ्या शिवभक्ताला कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, याबाबतची सर्व खबरदारी घेतल्याची माहिती त्यांनी दिली. स्वयंसेवकांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे नियोजन केले जाणार आहे. अनेक शिवभक्त 5 जूनलाच गडावर येतात. अनेकदा स्थानिक पोलिसांकडून त्यांची अडवणूक केली जाते. ही अडवणूक करू नये. गडावर सर्वांना एकाच वेळी राहता येईल एवढी जागा आहे त्यामुळे कोणत्याही शिवभक्ताची अडवणूक करू नये, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले आहे. रायगडाचा रांगडेपणा टिकलाच पाहिजे. वाहतूक नियोजनासाठी एक हजार शिवभक्त पोलिसांना उपलब्ध असतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
सुवर्णहोनच्या प्रतिकृतीचे अनावरण
दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या निमित्ताने पुण्यातील चंदूकाका सराफ यांच्या वतीने सुवर्ण होन तयार करण्यात आला आहे. या होनच्या प्रतिकृतीचे अनावरणही छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले.