येत्या 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा
पणजी : गोव्यातील विविध धरणांच्या पाण्याची पातळी खालावत असल्याने आणि पाऊस होत नसल्याने पाणी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा असल्याचा दावा कऊन ‘भिवपाची गरज ना’ असे निवेदन केले आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला असला तरी गोव्यातील अनेक भागात पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे समोर आले आहे. डॉ. सावंत यांनी काल मंगळवारी खाण व जलस्रोत खाते यांची संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 15 जुलैपर्यंत पाणी मिळेल एवढा साठा विविध धरणांमध्ये शिल्लक आहे. काही वेळा जलवाहिन्या फुटतात व पाणी वाया जाते. ते रोखण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, पाण्याबाबत चिंता करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्याही अनेक भागात पाईप फुटल्यामुळे पाणीटंचाई होत आहे, परंतु पाण्याची कमतरता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
खनिज डंप धोरण अंतिम टप्प्यात
खाण ब्लॉकचा ई-लिलाव करण्याचा तिसरा टप्पा लवकरच हाती घेण्यात येणार असून चिरेखाणी, रेती काढण्याची परवाना प्रक्रिया सुटसुटीत करण्यावर भर देण्यात येणार आहे. खनिज डंप धोरण अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण कऊन अंमलात आणले जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पाणी संवर्धन मंडळाची बैठक लवकरच
महाराष्ट्र सरकारसोबत पाणी संवर्धन मंडळाची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून त्यात तिराळी, विर्डी, म्हादईबाबत चर्चा केली जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
‘प्रवाह’ माध्यमातून होणार म्हादईवर चर्चा
म्हादई लवादाच्या निवाड्यानुसार पाणी वाटप करण्यासाठी ‘प्रवाह’ प्राधिकरणाची स्थापना झाली असून त्याकरता पणजीत कार्यालयीन जागा देण्यात येणार आहे. म्हादईची चर्चा आता ‘प्रवाह’ माध्यमातून होणार आहे. प्रवाहचे कार्यालय गोव्यात सुरु होणार असल्याने ते गोव्यासाठी सहाय्यकारक ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
चिरेखणी, रेती व्यवसाय होणार कायदेशीर
खाण ब्लॉकची ई-लिलाव प्रक्रिया वेगाने करण्यावर भर देण्याचे ठरवण्यात आले असून चिरेखाणी, रेती काढण्यासाठी परवाने देण्यात येतील. त्यामुळे ते उद्योग कायदेशीर होतील. डॉ. सावंत यांनी दोन्ही खात्यांच्या एकंदरित कामगिरीचा आढावा घेतला तसेच धरणातील पाणी साठ्याचा तपशीलही नजरेखालून घातला.